
नागपूर: नंदनवन परिसरातील एका कॅफेमध्ये सुरू असलेल्या मध्यरात्रीच्या पार्टीदरम्यान दोन तरुण गटांमध्ये झालेला वाद हिंसक वळणावर गेला. हाणामारीनंतर कॅफेला आग लावल्याची धक्कादायक घटना मंगळवार, ३ फेब्रुवारीच्या पहाटे घडली. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण-तरुणी कॅफेमध्ये मध्यरात्री पार्टीसाठी जमले होते. पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा शाब्दिक वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. या मारहाणीनंतर संबंधितांपैकी एका गटाने कॅफेला आग लावल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणी रिषिकेश राजेश वाघमारे (वय २६, रा. प्लॉट क्र. ५५२, गौतम वाचनालयाजवळ, सिरसपेठ, रेशीमबाग, नागपूर) यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी फैजल शेख (वय २१, रा. महिंद्रा नगर, गल्ली क्र. ५, राणी दुर्गावती चौकाजवळ, नागपूर) याच्यासह ७ ते ८ अज्ञात साथीदारांविरोधात आरोपी म्हणून नावे नोंदवली आहेत.
घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.








