Published On : Mon, Feb 26th, 2018

सामाजिक विकासात नगरसेविकांची भूमिका अत्यंत मोलाची : महापौर नंदा जिचकार

Advertisement

Mayor Nanda Jichkar
नागपूर: सामाजिक विकासात नगसेविकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. नगरसेविका सर्वप्रथम आपले घर सांभाळून समाजाच्या विकासकामात लक्ष देत असते, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. सोमवार (ता.२६) महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवनात नागपूर महानगरपालिका आणि इक्वी सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, नगरसेवक विरेंद्र (विक्की) कुकरेजा, जितेंद्र घोडेस्वार, ज्येष्ठ विधिज्ञ कुटुंब न्यायालयाच्या अध्यक्षा ॲड तेजस्विनी खाडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, नगरसेविका ही सर्वप्रथम एक स्त्री आहे. ती स्वतःच्या घराबरोबर समाजाचेही हित बघत असते. पुरूषांनी महिलांना समजून घेतले पाहिजे. पूर्व काळात महिलांचे दमन झाले होते. ज्यांचे दमन होते, त्यांना आरक्षण प्राप्त होते. त्या आरक्षणामुळे महिला आज लोकप्रतिनिधी होऊ शकल्या आहेत. आज महापालिकेत ५० टक्के महिला नगरसेविका आहे. नगरसेविका या गृहिणी, समाजसेविका या रूपात वावरत असते. त्यामुळे तिचा जनसंवाद कसा असला पाहिजे, तिचे वक्तृत्व कसे असले पाहिजे, तिला दिवसभर घौडदोड करावी लागते, यासाठी कसा आहार तिने करायला हवा, याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवकांनी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. या कार्यशाळेद्वारे आपल्याला मिळणारे ज्ञान आपण इतरांनाही पोहचते करावे, असेही त्यांनी प्रतिपादित केले.

कार्यशाळेच्या मुख्य अतिथी ॲड.तेजस्विनी खाडे बोलताना म्हणाल्या, स्त्री आणि पुरूष समाजाचे अविभाज्य घटक आहे. घटनेने त्यांना समान अधिकार दिले आहे. आजच्या विज्ञानाच्या युगात बऱ्याच क्षेत्रात स्त्रिया पुढे आहे. आज एकही क्षेत्र असे नाही की जे स्त्रियांनी पादांक्रात केले नाही. ज्या क्षेत्रात स्त्रिया पुढे आल्या, त्या क्षेत्रात त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. आपणही लोकप्रतिनिधी आहात, आपणही आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने कराल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभागातील महिलांना त्यांच्या अधिकारासाठी अवगत करावे, स्त्रियांची भूमिका समाजात महत्त्वाची आहे. महिलांना कायद्याने दिलेल्या अधिकारांची जाणीव असणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी जेंडर जस्टीस, जेंडर राईट्स , जेंडर लॉ आणि जेंडर रेग्यूलेशन्स या विषयावर पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यात निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सचिव डॉ.उर्मिला क्षीरसागर यांनी व्यक्तीकडे बघण्याचा सामाजिक आणि मानसिक दृष्टीकोन, लिंग असमानता आणि भेदभाव या विषयावर मार्गदर्शन केले. श्रीमती पेंढारकर यांनी दैनंदिन आहार या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शेखर गिरडकर यांनी केले. कार्यशाळेला मनपातील नगरसेविका व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.