Published On : Thu, Feb 18th, 2021

मनपाच्या बंद पडलेल्या शाळा लवकरच होणार सुरू : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

झिंगाबाई टाकळी मनपा प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेला महपौरांनी दिली भेट

नागपूर : मोफत आणि सर्वोत्तम शिक्षण प्रत्येक मुलांचा मुलभूत अधिकार आहे. वस्तीत राहणाऱ्या प्रत्येक मुलांना शिक्षण देण्यासाठी मनपाच्या बंद पडलेल्या शाळा पुर्ववत सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी मनपाने योग्य ती कार्यवाही सुरू केली असून शहरातील मनपाच्या बंद पडलेल्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीच्या निवेदनावरून महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (ता. १७) झिंगाबाई टाकळी मनपा प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते.

यावेळी सत्तापक्षनेता संदिप जाधव, नगरसेविका अर्चना पाठक, नगरसेविका संगीता गिऱ्हे, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीचे मार्गदर्शक अमिताभ पावडे, प्रमोद काळबांडे, संयोजक दीपक साने, सदस्य संजय भिलकर उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी बंद असलेल्या झिंगाबाई टाकळी मनपा प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेचा परिसर, वर्गखोल्या आणि इमारतीची पाहणी केली. शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी मनपा सकारात्मक आहे, यासाठी योग्य ते प्रयत्न सुरू आहेत. तसेच पालकांनी मुलांना मनपाच्या शाळेत पाठविण्याचे आवाहन यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

महापौर दयाशंकर तिवारी पूढे म्हणाले की, मनपाच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी मनपाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. सर्वप्रथम मनपाच्या शाळेचा युनिफॉर्म बदलविला, शिक्षणास पोषक वातावरण निर्मिती करण्यात आली, अनेक शाळेमध्ये कंप्युटर लॅब आणि कलादान सुरू करण्यात आले. परिणामी, मागिल चार वर्षापासून मनपाच्या शाळेतील विद्यार्थी ९० टक्के गुण घेउन पास होत आहेत. मनपाच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढला असून आता मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलाचे नाव मनपाच्या शाळेत टाकावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. मनपाच्या सुरेन्द्रगड शाळेच्या दोन विद्यार्थींनी रामेश्वरम येथून सर्वात कमी वजनाचा उपग्रह अंतरिक्षात सोडून इतिहास रचला.

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, सध्याच्या युगात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे काळाची गरज बनलेली आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून आर्थिक कमकुवत गटातील पालकही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकत आहेत. त्यामुळे शहरात मनपाच्या इंग्रजी शाळा असाव्‍यात यासाठी सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मनपाच्या बंद पडलेल्या शाळेच्या ठिकाणीच या शाळा सुरू करण्यात येत असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. शाळेचा स्तर चांगला असावा यासाठी मुंबईच्या एका सामाजिक संस्थेसोबत मनपाचे काम सुरू आहे. यासाठी नविन शिक्षकांची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे. यामुळे महानगरपालिकेच्या शाळांतील गुणात्मक दर्जात वाढ होउन मनपाच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे मिळेल. यामुळे मनपाच्या शाळांचे मागिल दिवस लवकरच परत येतील असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

झिंगाबाई टाकळी मनपा शाळेत ठेवलेला सामान तत्काळ काढून शाळा स्वच्छ करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच येत्या सत्रापासून झिंगाबाई टाकळी येथील मनपाची बंद असलेली शाळा सुरू करणार असल्याची हमी महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली. श्री. अविनाश पावडे यांनी महापौरांचे सरकारी शाळा बचाव कृति समितीचा कार्यक्रमात सहभागी झाल्यावर अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की नागरिकांनी सरकारी शाळा बंद करण्याचा विरोध केला पाहिजे. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रमोद कालबांडे यांनी केले. यावेळी महापौरांना सरकारी शाळा बचाव कृति समितीचा अहवाल देण्यात आला.