Published On : Fri, Feb 28th, 2020

‘ऑनलाईन’ अफवांनी पसरतोय ‘कोरोना’चा ‘व्हायरस’: अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.

Advertisement

असामाजिक तत्त्वांकडून भीती निर्माण भारतीय बाजारपेठेला धक्का देण्याचा प्रयत्न.

नागपूर: चीनमध्ये थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’बाबत भारतात सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात असल्याचे चित्र आहे. असामाजिक तत्त्वांकडून भारतीय बाजारपेठेला धक्का देण्यासाठी ‘कोरोना’ची भीती पसरविण्याची शक्‍यता बळावली आहे. एकूणच अफवांचाच ‘व्हायरस’ जास्त धूमाकूळ घालत असल्याने चीनप्रमाणे ‘कोरोना’ या शब्दांवरच ‘सेन्सारशीप’ घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

असामाजिक तत्वे या “कोरोनाव्हायरस’चा “ऑनलाईन गैरफायदा” घेत देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याची नागरिक म्हणून प्रत्येकानेच दखल घेत कुठलीही अफवा किंवा शास्त्रीय माहिती नसेल तर कुठलीही पोस्ट शेअर करताना विचार करण्याची गरज सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली आहे. जगभरात आतापर्यंत 17,388 लोकांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला असून यातील 17,205 नागरिक चीनमधील आहेत. या आजाररुळे 362 लोकांचा मृत्यू झाला असून यात चीनमधील 231 लोकांचा समावेश आहे. व्हिनेगर पिण्यामुळे कोरोनाव्हायरसवर परिणाम होणार नाही, सकारात्मक रहा काहीच होणार नाही, कॅफिन पिऊ नका, यामुळे धोका वाढू शकतो, अशा अफवा सोशल मिडियावर फसरविणाऱ्यांवर कारवाई करीत चिनी सरकारने 250 लोकांना तुरूंगात टाकले. जगभरात 2.2 अब्जावर नागरिक प्रति महिना फेसबूक हाताळत आहे.

परंतु चीन सरकारने ‘फेसबुक’वर कठोर ‘सेन्सारशिप’ लावली आहे. चुकीच्या माहिती किंवा अपूर्ण माहितीवरील बातम्या आपल्या देशात सुद्धा पाठवण्यात येत आहे. यावरही सेन्सरशीप आवश्‍यक आहे. मद्यपान करणाऱ्याला “कोरोनाव्हायरस”चा धोका नाही, “अब कैसा रोना, एक पेग मे पॅक होगा कोरोना’, असे स्लोगन बाजारात दिसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोनाबाबात मार्गदर्शक तत्त्वामध्ये अल्कोहोलचा उल्लेख आहे. परंतु कोरोना व्हायरस दारू पिण्यामुळे बरा झाला, असे कुठेही नमुद नाही. मार्गदर्शक तत्त्वांत हात साबणाने आणि पाण्याने धुवावेत आणि घाणेरडे असल्यास अल्कोहोल आधारित हॅंडवॉशचा वापर करू शकतात, असे म्हटले आहे. परंतु याचा संबंध मद्यपानाशी जोडण्यात येत आहे.

” कोरोनाव्हायरस’ हा फक्त लसूण मिश्रित पाणी पिल्याने दूर होतो, फक्त काही विशिष्ट प्रकारचे “मास्क’ वापरल्यास या आजाराचा संसर्ग होत नाही, सुपर मार्केट, बाजारपेठा व भाज्यांची दुकाने या संसर्गाची उगमस्थाने आहेत, चीनमधून ई-मेलद्वारे येऊ शकतो, हा आजार लिफाफ्यातून किंवा पत्राद्वारे पसरवता येतो आदी अफवा पसरविल्या जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसावा, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आर्थिक संबंध, प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने कोरोनाव्हायरसचा संबंध थेट भारतीय उद्योग व नागरिकांसोबत जोडण्यात येत आहे. विमानतळ, बस स्थानके, रेल्वे इत्यादी ठिकाणी भीतीदायक वातावरण पसरवायचा प्रयत्न सुरू असल्याचे पारसे यांनी नमुद केले. चीनमधील आणि जगभरातील प्रत्येकाला कोरोना व्हायरसपासून स्वतः आणि कुटुंबीयांचे संरक्षण कसे करावे याबद्दल अचूक माहिती पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया एकमात्र प्रभावी माध्यम आहे.

फेसबुक व इंस्टाग्रामवर ‘कोरोनाव्हायरस’ हा शब्द आल्यास ब्लॉक किंवा प्रतिबंधित करणे, त्यानंतर संबंधित पोस्टमधील माहितीबाबत तपासणी करणे आवश्‍यक आहे.

“कोरोनाव्हायरस’ अमेरिकेचा चीनविरूद्ध जैविक शस्त्र आहे, अशा बातम्याही पसरविल्या जात आहे, सृष्टीचा अंत आहे, अशा बातम्या येत असून यापासून सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शेअर बाजारावर परिणाम 
जगातील शेअर बाजारावर कोरेनाव्हायरसचा विपरित परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेत शेअर बाजार गडगडल्यानंतर आज देशातही शेअर बाजाराला उतरती कळा लागली. काही मिनिटांमध्ये देशातील काही कोटी रुपये गमवावे लागले. आज सकाळी शेअर बाजारात 1448 अंशाने घसरण नोंदविण्यात आली. अवघ्या काही मिनिटांत 5.50 लाख कोटीचे नुकसान सहन करावे लागले.

सोशल मिडियाच्या नकारात्मक वापरामुळे कोरोना व्हायरसचा जगभर उद्रेक होत आहे. यावर नियंत्रणही सोशल मीडियाच्या सकारात्मक मार्गानी शक्य आहे. अन्यथा या आजाराच्या अफवांचे लोण देशातील  अर्थव्यवस्थेवर, पर्यटनावर व सामाजिक सुरक्षेवर आघात करणारे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 – अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक.