
नागपूर -नागपुरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावरून शहरातील राजकारण तापले असून काँग्रेसने बुधवारी मनपा मुख्यालयावर जोरदार आंदोलन केले. अनियमित जलपुरवठा, दूषित पाण्याच्या तक्रारी आणि वाढीव पाणीबिलांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासन आणि ओसीडब्ल्यूविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
शहरातील अनेक भागांत नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे, पाणीपुरवठा सुरळीत नसतानाही नागरिकांच्या माथी अवाजवी बिलांचा बोजा टाकला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनपा मुख्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी प्रशासनावर नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तीव्र आंदोलन छेडले.
विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी प्रशासनावर निशाणा साधत, “नागपुरकरांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा देण्यात मनपा आणि ओसीडब्ल्यू पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. नागरिक त्रस्त असताना प्रशासन मात्र केवळ आश्वासनांची भाषा करत आहे,” अशी टीका केली.
दरम्यान, शहरातील पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला.







