Published On : Thu, May 10th, 2018

मुख्यमंत्र्यांना वर्धा शहरात प्रवेश बंदी?

Advertisement

Devendra Fadnavis
वर्धा: किसान अधिकार अभियानच्या कार्यकारिणीने मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घोषित केली असून ज्या मुख्यमंत्र्यांना शेतकरी शेतमजुरांची चिंता नाही त्यांनी आमच्या जिल्ह्यात येऊ नये असा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्धा शहरात प्रवेश करण्यासाठी किसान अधिकार अभियानचे कार्यकर्ते रोकणार आहेत.

किसान अधिकार अभियानच्या कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्र्यांना शहरात प्रवेश करण्यापासून निषेध करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. येत्या १२ मे २०१८ ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका खासगी कार्यक्रमात भाषण देण्यासाठी वर्धा शहरात येणार असल्याची माहिती किसान अधिकार अभियानाला मिळाली. किसान अधिकार अभियानच्या माध्यमातून गेल्या २० डिसेंबर २०१७ ला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारने मुद्दाम दुर्लक्ष केल्यामुळे आणि सातत्याने भेटी नाकारल्यामुळे व मागील ४ वर्षात वेळोवेळी पाठविलेल्या निवेदनांची कोणतीही दाखल न घेता निवेदनांना केराची टोपली दाखवीली आहे. शेतकरी शेतमजूर व ग्रामीण भागातील प्रश्नांना समजून घेण्यास सरकारकडे व मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही व त्यासाठी निधी व नियोजनही नाही.

तर मग नुसती भाषणबाजी करण्यासाठी आमच्या जिल्ह्यात येण्याची आवश्यकता काय आहे? असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना प्रवेश करू द्यायचा नाही असा निर्धार किसान अधिकार अभियानने केला आहे. १२ मे २०१८ ला संध्याकाळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या चालत्या गाडीसमोर आडवे लेटून जीव गेला तरी चालेल पण प्रवेश करू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते या दृष्टीने तयारीला लागले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ज्या मुख्यमंत्र्यांना भाषानाशिवाय शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही, त्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या जिल्ह्यात प्रवेश करू नये असा इशारा किसान अधिकार अभियानाने दिला आहे.