Published On : Sat, May 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘अमृत’ जलवाहिनीच्या कामामुळे शहरात स्वच्छ पाणीपुरवठा

दररोज ३७० टँकर ट्रिप्समध्ये घट, मनपाला सुमारे ५.५० कोटींची बचत
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अमृत-१, अमृत-१ (अतिरिक्त) व अमृत-२ योजनेंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये नव्या जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात येत असून, त्यामुळे कमी दाबाने व दूषित स्वरूपात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर प्रभावी नियंत्रण आणण्यात यश आले आहे. यामुळे नागरिकांना स्वच्छ, दाबयुक्त व नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नवीन भागात दररोज टँकरने होणाऱ्या ३७० ते ३८० ट्रिप्समध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे मनपाच्या सुमारे ५.५० कोटी वार्षिक खर्चाची बचत होत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा प्रशासन नागरिकांचा दर्जेदार सोयीसुविधा पुरविण्यावर भर देत आहे. शहरात अमृत योजनेअंतर्गत नव्या जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात येत आहे. यात इंदोरा-२ कमांड एरिया क्षेत्रातील ५३ किमी जुनी जलवाहिनी अमृत-1 (अतिरिक्त) योजनेतर्गत बदलण्यात आली आहे. यापूर्वी बुध्दनगर, आशीनगर, हबीब नगर, नईबस्ती, टेका नाका, सिद्धार्थनगर, वैषालीनगर, बाळाभाऊपेठ, ताजनगर या भागांमध्ये दूषित व कमी दाबाने पाणी मिळण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. त्यावर तोडगा काढत आतापर्यंत ३३०० पैकी २६०० नळ कनेक्शन नव्या जलवाहिनीवर स्थलांतरित करण्यात आले असून, १०५० अनधिकृत कनेक्शन अधिकृत करण्यात आले आहेत. तर सध्या बुद्ध नगर, आशीनगर, हबिब नगर, नई बस्ती, देविनगर, बाळाभाऊ पेठ आदी भागातील नवीन जलवाहिनी वरुन पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. पाणी दाब ५ ते ८ मीटरने वाढला असून या भागात स्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी दिली.

Gold Rate
02 June 2025
Gold 24 KT 96,000/-
Gold 22 KT 89,300/-
Silver/Kg 98,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच बिनाकी एक्झिस्टिंग कमांड एरियातील येणाऱ्या भागातील २३ किमी जुनी जलवाहिनी अमृत-१ (अतिरिक्त) योजनेतर्गत नव्याने टाकण्यात आली आहे. पंचशील नगर, बाबाबुद्ध नगर, पचकुंवा, हनुमान सोसायटी, महेंद्रनगर, आदर्श नगर, सुजाता नगर आदी भागांमध्ये याआधी संप लेव्हलपर्यंत पाणी मिळत होते व पाणी दूषित असायचे. सध्या पंचशील नगर, पचकुंवा, हनुमान सोसायटी, बाबाबुद्ध नगर येथे नव्या जलवाहिनीवरून स्वच्छ व दाबयुक्त पाणी मिळत आहे. उर्वरित ठिकाणी कार्य प्रगतीपथावर आहे.

नारा एन.आय.टी. व नारी-2 कमांड एरिया क्षेत्रात अमृत-१ अंतर्गत ५० किमी व अमृत-२ अंतर्गत २० किमी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याआधी पांजरा, रोहिणी सोसायटी, दुर्गामाता नगर, समता नगर, गनेशनगरी, अशोकानगर आदी भागात दररोज १९० ते २०० टँकर ट्रिप्सने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता दोन हजार नव्या नळ कनेक्शनमुळे टँकर पुरवठा पूर्णतः थांबवण्यात आलेला आहे.

उप्पलवाडी वांजरा कमांड एरिया क्षेत्रात अमृत-१ अंतर्गत २० किमी व अमृत-२ अंतर्गत ३० किमी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तर पाहुणे लेआऊट, भिमवाडी, माँ बंबलेश्वरी नगर, रहमत नगर, बिल्लाल नगर आदी भागात २२०० ते २४०० नळ कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी होणारा १८० ते १९० टँकर ट्रिप्सचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला आहे. अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. कमकुवत दाब, दूषित पाणी व टँकर अवलंबनाच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यात मनपाला यश आले असून, यामुळे स्वच्छ, सातत्यपूर्ण आणि दाबयुक्त पाणी नागपूरकरांना मिळत आहे. विशेष म्हणजे, उर्वरित भागांतील कामे प्रगतीपथावर आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement