नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने 2026 पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयाला अधिकृत मान्यता दिली आहे. ही माहिती सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी आज दिली.
नवीन प्रणालीनुसार, दहावीच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मे महिन्यात घेतला जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अनिवार्यपणे बसावे लागणार असून दुसरा टप्पा पर्यायी असणार आहे.
सीबीएसईने स्पष्ट केलं आहे की, पहिल्या टप्प्याचा निकाल एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्याचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात येईल. विशेष बाब म्हणजे, अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच करण्यात येणार आहे, अशी देखील माहिती मंडळाने दिली आहे.
सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता दोन संधी मिळणार असून, दुसऱ्या टप्प्यात उत्तम गुण मिळवण्याची संधी उरते. नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा, तर पालक व शिक्षकांसाठी नवा टप्पा सुरू होण्याच्या दिशेने हे पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.