नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) भूषण रामकृष्ण गवई यांचे नागपुरात प्रथमच आगमन झाले, आणि या विशेष प्रसंगी नागपूर जिल्हा वकिल संघटनेतर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात न्यायिक वकिल समुदायासह विविध मान्यवर आणि नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा न्यायालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमात सीजेआय गवई यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी त्यांना शाल, श्रीफळ आणि फुलांचा हार घालून सन्मानित करण्यात आले.
“मला वकील किंवा न्यायाधीश व्हायचं नव्हतं, पण…”
यावेळी बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, “माझं आयुष्य न्यायालयीन सेवेत जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं. ना मी वकील व्हायचं ठरवलं होतं, ना न्यायाधीश. पण वडिलांचा शब्द मान्य केला आणि आज मी इथपर्यंत पोहोचलो.” आपल्या वडिलांना आठवत सीजेआय गवई यांचे डोळेही पाणावले. “माझा मुलगा एक दिवस देशाचा मुख्य न्यायाधीश बनेल,” असा आशिर्वाद वडिलांनी दिला होता, असं त्यांनी सांगितलं.
बाबासाहेबांच्या विचारांमुळे सर्वोच्च शिखर गाठलं-
गवई पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या यशाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या विचारांमुळे आणि मार्गदर्शनामुळेच मी आज या सर्वोच्च पदावर पोहोचलो आहे.” त्यांनी भारतीय संविधानाला देशाच्या अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा खरा आधारस्तंभ म्हटलं.
संविधान हे आपल्या राष्ट्राची खरी ओळख-
“बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षांहून अधिक काळ मेहनत घेऊन जे संविधान तयार केलं, त्याच्या जोरावर आज भारताची एकता आणि अखंडता अबाधित आहे,” असं भावनिक उद्गार सीजेआय गवई यांनी काढले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती-
या सत्कार समारंभाला सीजेआय भूषण गवई यांची आई कमलताई गवई, पत्नी तेजस्विनी गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, न्या. प्रसन्ना वराले, न्या. अतुल चांदूरकर, तसेच जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रोशन बागडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.