नागपूर, : नागपूर महानगरपालिकातर्फे प्रधानंमत्री आवास योजना घटक क्र. 03 (AHP) अंतर्गत मौजा वांजरा खं. क्र. 24/4, 24/6 जागेवर बांधण्यात आलेले 480 ईडब्ल्यूएस (EWS) सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकास कामांचे लोकार्पण रविवार (ता.22) करण्यात आले. कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना सदनिकांच्या किल्ली सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मनपाने अतिशय उत्तम सदनिका तयार केल्याची भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सहा ही विधानसभा क्षेत्र निहाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किमान एक हजार घरांच्या इमारती उभारण्यात याव्या, जेणेकरून नागरिकांना राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. त्यांनी सांगितले की, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना देखील मालकी हक्काचे पट्टे दिले जात असून, पुढील काळात सर्वाना पक्के घरे मिळतील. असा विश्वास व्यक्त केला. तसेच मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राला अतिशय सुंदर व देखणी इमारत प्रमाणे दर्शविण्याचा देखील सूचना त्यांनी यावेळी दिली. नागपूर हे हरित शहरांच्या यादीत असून, येथील विकासासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक अशा ई बसेस देखील नागरिकांच्या सेवेत उपलब्धता करून दिली आहेत, तरी नागरिकांनी स्वतःच्या वाहनांचा कमीत कमी उपयोग करून सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असे ही श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
याप्रसंगी प्रधान सचिव श्री.गोविंद राज, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत,अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उप सचिव श्रीमती विद्या हंपिया, अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकर, मनपाचे मुख्य अभियंता श्री मनोज तालेवार, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, एसडीपीएलचे संचालक श्री. गौरव अग्रवाल, पीएमसीचे श्री.दिनेश वराडे यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना हजार रुपयात त्यांच्या घराची रजिस्ट्री करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतल्या बद्दल मुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वर्षात केंद्र शासनाच्या निधीतून राज्यातील दीड कोटी जनतेसाठी ३० लाख घरे उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वप्नानिकेतन बद्दल माहिती देत राज्य शासनाकडून निधीची उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या स्वप्ननिकेतन सदनिकांच्या हस्तांतरणासोबतच मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या पाचपावली अग्निशमन केंद्र, स्वच्छता विभागाच्या नव्या दोन चोकेज रिसायकलर मशीन, ओंकारनगर येथील स्मार्ट टॉयलेट, हॉट मिक्स प्लांट नवीन मशिनरी, कळमना जलतरण तलाव, २७ आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र, ट्री ट्रान्सप्लांटर मशिन, अग्निशमन फायर टेंडर्स, राज्य शासनाच्या निधीतून प्राप्त बसेसचे आणि अंबाझरी दहन घाटाकडे जाणाऱ्या पुलाचे लोकार्पण सह मेहंदी बाग उड्डाणपुलाखाली, दही बाजार उड्डाणपुलाखाली, सक्करदरा उड्डाणपुलाखाली, दिघोरी उड्डाणपुलाखाली लँडस्केपिंग आणि सुशोभीकरणाचे काम, जे पी नगर मेट्रो स्टेशनच्या उभ्या भिंतीवर ग्राफिटी वर्क म्हणून ओळखले जाणारे प्रॉव्ह. लँडमार्क आर्ट पेंटिंग, चौकात महिलांच्या जीवनासह सायकलचे भित्तिचित्र, नरेंद्र नगर चौकात उभ्या असलेल्या अंतराळवीराचे भित्तिचित्र आदींचे लोकार्पण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्कृष्ट अमलबजावणी बद्दल मनपाच्या चमू सह, एसडीपीएल व पीएमसी चमूचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी यांनी व्यक्त केले. यावेळी उपायुक्त श्री. राजेश भगत, श्री. विनोद जाधव, श्री. अशोक गराटे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते, नगररचना विभागाचे श्री.ऋतुराज जाधव, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल उईके, श्री. प्रतिक गजभिये, एसडीपीएलचे उन्मेष धोटे व इतर उपस्थित होते.