मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिले ओबीसी मंत्रालय : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

गुमगाव, कान्होलीबारा, हिंगणा, वाडी येथे जाहीरसभा भरउन्हात हजारो नागरिकांची उपस्थिती

नागपूर: काँग्रेसने 65 वर्षे महाराष्ट्रात आणि देशत राज्य केले. एकापेक्षा एक मुख्यमंत्री या राज्यात पदावर आले. पण ओबीसींची ओबीसी मंत्रालयाची मागणी एकानेही पूर्ण केली नाही. काँग्रेसने ओबीसींवर सतत अन्यायच केला आहे. जातीपातीचा भेद समाजात पसरवणार्‍या काँग्रेसने ओबीसींची ही मागणी का पूर्ण केली नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना न्याय देण्यासाठी ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून काम सुरु केले, हे ओबीसींनी लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून हिंगणा मतदारसंघातील भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार समीर मेघे यंना विजयी करण्याचे आवाहन केले.

पालकमंत्र्यांनी आज या विधानसभा मतदारसंघात चार जाहीरसभांना संबोधित करून प्रचारात आघाडी घेतली आहे. गुमगाव, कान्होलीबारा, हिंगणा आणि वाडी येथे पालकमंत्र्यांनी जाहीरसभांना संबोधित केले. या सर्व ठिकाणी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनीही मतदारांना कमळालाच मतदान करण्याचे आवाहन केले. या सभांना उमेदवार आ. समीर मेघे, खा. विकास महात्मे, वर्षा उसगावकर, गिरीश देशर्मुंख, विशाल भोसले, उमेश आंबटकर, रवीभाऊ जोडांगळे, श्यामसुंदर मनीयार, वर्षा शाहकार, सतीश शहाकार, किशोर बिडवाईक, गुणवंतराव मते, सुरेश खोंडे, संजय बुधे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- 4 लाख नागरिकांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. शासनाच्या 45 योजना या मतदारसंघात आणून गरीबांना त्याचा लाभ द्यायचा असेल तर समीर मेघे यांना निवडून आणणे आवश्यक आहे. मागील 5 वर्षात 25 वर्षे झाली नसतील एवढी कामे या मतदारसंघात झाली आहेत. आता 10 वाजून 10 मिनिटांचे घड्याळ बंद आहे. त्याला बंदच राहू द्या. कमळाच्या फुलावर येणार्‍या लक्ष्मीचे स्वागत करा, असेही पालकमंत्री म्हणाले.
माझ्यावर अन्याय नाही : पालकमंत्री

माझ्यावर पक्षाने कोणताही अन्याय केला नाही. उलट मला पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. तेली समाज नाराज असा गैरसमज पसरवला जात आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. जातीपातीच्या आधारावर कोणतेच मतदान करू नका. आमदार हा गुणवत्तेनुसार ठरत असतो, जातीपातीच्या आधारावर नाही, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. या चारही सभांना हजारोच्या संख्येत महिला आणि पुरुषांनी गर्दी केली होती.