Published On : Mon, Nov 4th, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी

अकोला – ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, सर्वश्री आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.

आपल्या या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी लाखनवाडा येथील संजय त्र्यंबक अघडते यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्या चार एकर शेतातील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. अघडते यांच्या शेतात सोयाबीनची नुकसानग्रस्त गंजीही मुख्यमंत्र्यांनी पाहिली. समोरच असलेल्या केशव नामदेव गावंडे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या ज्वारीच्या कणसांना पावसामुळे कोंब फुटले आहेत. तसेच मनोहर गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन पावसामुळे खराब झालेले आढळून आले. यावेळी श्री.फडणवीस यांनी शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कापशी रोड येथील गोपाल राऊत यांच्या शेताला भेट दिली. गोपाल राऊत यांच्या शेतातील सोयाबीनचे पिक त्यांनी कापणी करुन तयार केले होते. त्यांच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गंजी लावून ठेवली होती. परंतु सततच्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोयाबीनच्या तयार दाण्याना कोंब फुटले व पत्रा शेड गळून पावसाचे पाणी गेल्यामुळे सर्व सोयाबीन खराब झाले आहे.

चिखलगाव येथील कृष्णकांत नारायणराव तिवारी यांच्या कापूस व विनोद नामदेव थोरात यांच्या सोयाबीनच्या पिकाची मुख्यमंत्र्यांनी भेट देवून पाहणी केली. परतीच्या प्रवासात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी म्हैसपूर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले.

Advertisement
Advertisement