
नागपूर : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. शहरातील कथित भ्रष्ट कचरा कंत्राटदारांना तात्काळ हटविण्याची मागणी आमदार विकास पांडुरंग ठाकरे आणि यांनी सभागृहात केली.
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत घनकचरा संकलन व व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या AG Enviro Infra Projects Pvt. Ltd. आणि BVG India Ltd. या कंपन्यांवर गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. शहरात स्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी येत असून कचरा संकलनातील ढिसाळपणा, वेळेवर सेवा न देणे आणि मनपाला आर्थिक तोटा झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
आमदार ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात स्वच्छता व्यवस्थेची अशी दुरवस्था असणे लाजिरवाणे आहे. कंत्राटदारांच्या कारभाराची सखोल चौकशी करून त्यांचा करार तातडीने रद्द करावा.” आमदार दटके यांनीही या मागणीला पाठिंबा देत शहराच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.
या चर्चेला उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे सांगत, दोषी आढळल्यास संबंधित कंपन्यांचा करार रद्द करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर नागपूरकरांमध्ये आशेची नवी किरण निर्माण झाली आहे.
शहराला खऱ्या अर्थाने ‘क्लीन अँड ग्रीन’ बनवण्यासाठी सक्षम आणि पारदर्शक घनकचरा व्यवस्थापन प्रणालीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. आता सरकार प्रत्यक्षात कितपत कठोर पावले उचलते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.








