
नागपूर : शहरात एका साध्या विनोदातून गंभीर हल्ल्याची घटना समोर आली आहे. “गुलाबजाम खायला द्या,” असे मजेत बोलणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष मेश्राम, बादल शेंडे आणि अक्षय नागपुरे हे तिघे केटरिंग व्यवसायात काम करतात. ९ मे रोजी रात्री काम संपवून परतत असताना त्यांची भेट परिचित मो. अख्तर रजा याच्याशी झाली. वातावरण हलके करण्यासाठी अख्तरने “गुलाबजाम आणले असतील तर आम्हालाही द्या,” असे विनोदाने म्हटले.
मात्र, या बोलण्याचा राग आल्याने आरोपी संतापले. सुरुवातीला त्यांनी अख्तरसोबत वाद घालत शिवीगाळ केली आणि तेथून निघून गेले. काही वेळाने तिघेही पुन्हा परत आले आणि अख्तरला गाठून त्याच्याशी हुज्जत घालू लागले.
वाद वाढताच आरोपींनी चाकू काढून अख्तरवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या मांडीवर गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी जखमी अवस्थेतील अख्तरला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
माहिती मिळताच शांतिनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.








