
नागपूर– गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादाच्या समझोत्यासाठी जमलेल्या दोन गटांमध्ये अचानक रक्तरंजित संघर्ष उफाळून आला. डीजेवर नाचगाण्यादरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा तडजोडीने निकाल लावण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, बोलणी सुरू असतानाच दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि त्याचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.
ही घटना भिवसनखोरी परिसरात घडली. सोहेल तौफिक शेख हा आपल्या मित्रांसह समझोत्यासाठी तेथे पोहोचला होता. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर समीर मेंढे, ऋषी उके, अविनाश डोंगरे आणि अतुल चव्हाण यांच्यासह इतरांनी मिळून धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात सोहेल शेख आणि त्याचा मित्र कशिष रहांगडाले गंभीर जखमी झाले. दोघांवरही मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकू आणि कुऱ्हाडीने करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.







