नागपूर -राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीमध्ये जागावाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, संपूर्ण राज्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते नागपूर विधानपरिषद मतदारसंघाने. कारण, येथे भाजपने स्पष्ट वर्चस्व निर्माण केले आहे.
नागपूर मतदारसंघातील एकूण ७९४ मतांपैकी तब्बल ५०१ मते भाजपकडे आहेत. तर, शिंदे गटाच्या शिवसेनेकडे केवळ ३० आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अवघी ५ मते आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये भाजपची बाजू अत्यंत मजबूत मानली जात असून उमेदवारीवर भाजपचाच निर्णायक प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राज्यातील १७ पैकी तब्बल १४ मतदारसंघांत भाजपकडे बहुमताचा आकडा असल्याने महायुतीत भाजप “मोठा भाऊ” ठरत आहे. नागपूरसह विदर्भातील भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि अमरावती मतदारसंघातही भाजपचे वर्चस्व कायम असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
दरम्यान, महायुतीत जागावाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी नागपूरची जागा भाजपच्या खात्यात जवळपास निश्चित मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत सामंजस्याने तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट केले आहे.








