दीनदलितांच्या समस्या भाजपानेच सोडविल्या : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

17 गावांमध्ये झंझावाती प्रचार

नागपूर: राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आल्यानंतर दीनदलितांच्या समस्या फक्त भाजपानेच सोडविल्या. विकास कामे करायची असतील, गावांचा विकास साधायचा असेल तर भाजपा उमेदवाराच्या कमळ चिन्हालाच मतदान करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कामठी विधानसभेतील आजनी, गादा, नेरी, उनगाव, सोनेगाव, भोवरी आवंडी, लिहीगाव, कापसी आसोली, दिघोरी, गारला, परसाड, निंबा, सेलू, एकर्डी, उमरी या गावांमध्ये पालकमंत्र्यांनी प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत अनिल निधान, टेकचंद सावरकर, रमेश चिकटे, नरेश मोटघरे, संकेत बावनकुळे, मोबीन पटेल, उईके आदी उपस्थित होते.

गेले 15 वर्षे या मतदारसंघाचे मी प्रतिनिधित्व केले. नागरिकांनी मला प्रचंड सहकार्य केले असे सांगताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- माझ्या कामाची मतदारांनी कदर केली आहे. गावाच्या आणि गरिबांच्या विकासाचे माझे ध्येय आहे. भाजपानेच दीन दलित आणि मागासवर्गीयांच्या समस्या सोडवल्या.

कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न करता विकास केला. काँग्रेसची आजची अवस्था पाहता सर्व नेते माजी आहेत आजी कुणीच नाही, हे मतदारांनी लक्षात घ्यावे. केंद्रात आपले सरकार आहे, राज्यातही आपले सरकार येणार आहे. आपले एकच मत संपूर्ण गावाचा विकास घडवू शकते. म्हणूनच भाजपा उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या नावासमोरील कमळ चिन्हाचे बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.

कामठी मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचारात सहभागी झाले होते. तसेच भरदुपारी उन्हात गावातील नागरिक आणि महिलाही या प्रचारसभेत सहभागी झाल्या होत्या. याशिवाय खसाळा, भिलगाव, रनाळा, येरखेडा, कामठी येथेही कार्यकर्त्यांच्या सभा घेऊन भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.