Published On : Fri, Oct 11th, 2019

मुख्यमंत्री नागपूरमध्ये उपलब्ध नसतात, त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत..! – डॉ. आशिष देशमुख

Advertisement

नागपूर– मुख्यमंत्री नागपूरमध्ये उपलब्ध नसतात, त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. भ्रष्टाचाराची पद्धत बदलली आहे. नागपूरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी हव्या तशा नोकऱ्या नाहीत. त्यामुळे मुला-मुलींना इच्छा नसतांनासुद्धा आई-वडिलांना एकटे सोडून घरापासून दूर दुसऱ्या शहरात जावे लागते. स्वयं रोजगाराच्या योजना कौशल्याविना बिन कामाच्या ठरल्या आहेत. बेरोजगार युवकांचे हाल होत आहेत.

नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे. नवीन गुंतवणूक नाही त्यामुळे बेरोजगार युवक, व्यवसाय, उद्योग, आय.टी. कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्यांना विकासाची संधी मिळालेली नाही. रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गरजू महिलांना प्रोत्साहन मिळेल अशा रोजगारासंबंधी योजनांचा अभाव आहे.

त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. हयात असलेल्या उद्योगांची या सरकारने वाट लावली आहे. सरकारी तिजोरी रिकामी आहे. याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहेत, असे प्रतिपादन काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे पुरोगामी विचार सर्वश्रेष्ठ आहेत. देवेंद्र फडणवीस हे संकुचित आणि संकीर्ण विचारसरणीचे आहेत. ही बहुजनांच्या पुरोगामी विचारांची लढाई आहे. मुख्यमंत्र्यांचे शहर स्मार्ट सिटीच्या फार दूर आहे. फ़क़्त सिमेंटचे रस्ते केल्याने स्मार्ट सिटी होत नाही. लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आवश्यक सुविधांची त्यासाठी गरज असते. नागपूर शहर गुन्हेगारीसाठी कुप्रसिध्द म्हणून ओळखले जाते. चेन स्नॅचींग व मुलींची
छेडखानी नेहमीचीच उदाहरणे आहेत. रात्री बाहेर जातांना महिलांना असुरक्षित वाटते. महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. फडणवीस स्वतः गृहमंत्री असतांना नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. आज युवती/महिलांना रोजगार व गृहोद्योगासाठी विशेष प्रशिक्षण देऊन मदत करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांचा आत्मसन्मान व विश्वास वाढेल. पेट्रोल, डीझेलच्या दरांनी उच्चांक गाठला

आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे. जीएसटी, नोटाबंदी व आर्थिक मंदी ही सरकारने लादलेली समस्या आहे. त्यामुळे व्यापारी भरडला जात आहे. लोकांना हातचा रोजगार गमवावा लागत आहे. अशा अनेक समस्यांमुळे जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यामुळे फडणवीसांना यावेळी
पराभवाचा सामना करावा लागेल”, असेही ते म्हणाले.

दि. १० ऑक्टोबर ला सकाळी ८ वाजता माटे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून त्यांनी भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ केला. सुभाष नगर, त्रिमूर्ती नगर, खामला, सोनेगाव, जयप्रकाश नगर, मनीष नगर, नरेंद्र नगर, छत्रपती नगर व लगतचा परिसर या रॅलीने पालथा घातला व जनसंपर्क साधला. यावेळी त्यांचेसोबत रॅलीमध्ये शहर कॉंग्रेस अध्यक्ष श्री. विकास ठाकरे, श्री. प्रफुल्ल गुडधे पाटील, श्री. राकेश पन्नासे, डॉ. आयुश्रीताई देशमुख व इतर वरिष्ठ नेते तसेच हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉंग्रेस शहराध्यक्ष श्री. विकास ठाकरे म्हणाले,“मागील पाच वर्षात फडणवीस सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही. जनता जागरूक झाली आहे. डॉ. आशिष देशमुख या तरुण व तडफदार युवकाला उमेदवारी दिल्यामुळे यावेळी फडणवीसांचा पराभव निश्चित आहे. बेरोजगारी, उद्योगधंदे, महागाई यामुळे जनता त्रासली आहे. काँग्रेसनी जी कामे केलीत ती भाजप सरकार करू शकली नाही. त्यामुळे आता लोकांना परत कॉंग्रेसची सत्ता हवी आहे.” सूचना- दि. ११ ऑक्टोबरला सकाळी ७.०० वाजता डॉ. आशिष देशमुख यांची रॅली जयताळा बसस्टॉप येथून निघेल. प्रमुख उपस्थिती- श्री. प्रफुल्ल गुडधे.