
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी तब्बल सात महिन्यांनंतर पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नव्या टीममध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची उपाध्यक्षपदी, तर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बी. एल. संतोष यांच्याकडे संघटनात्मक महासचिवपद कायम ठेवण्यात आले असून, अनिल बलुनी यांच्याकडे माध्यम प्रभारीपद कायम आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश अग्रवाल यांच्याकडे असलेली जबाबदारी बदलण्यात आली असून, राजेश मंगल यांची सह-खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या टीममध्ये युवक आणि महिलांना प्राधान्य देतानाच विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशसह आगामी विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांतील अनेक नेत्यांना राष्ट्रीय संघटनेत स्थान देण्यात आले आहे.
उपाध्यक्षपदी वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, भारती प्रवीण पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, प्रा. एम. नागराज, प्रा. तारिक मन्सूर आणि डॉ. मधुचंद्र कर यांचा समावेश करण्यात आला आहे.
सरचिटणीसपदी सुनील बंसल, विनोद तावडे, बिप्लब देव, स्मृती इराणी, सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपच्या या नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनुभवी नेत्यांसोबतच महिला आणि विविध सामाजिक घटकांना स्थान देण्यात आल्याने आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक रणनीतीला महत्त्व प्राप्त झाले आहे.




