Published On : Wed, Apr 10th, 2024

भाजप एक नंबरचा संस्कारशून्य पक्ष; सुधीर मुनगंटीवारांवर ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल

Advertisement

नागपूर : भाजपाचे चंद्रपूर मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर खालच्या पातळीवर टीका केली. मुनगंटीवार यांच्या टिकेवरून ठाकरे गटाने सामानाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर हल्लाबोल केला.

काँग्रेस हा भाऊ-बहिणीच्या नात्याला गळफास लावणारा आणि एकाच बेडवर झोपवणारा पक्ष आहे,असे मुनगंटीवार म्हणाले होते. यावर भाजपा हा एक नंबरचा संस्कारशून्य पक्ष आहे. मोदी ज्या मंचावर होते त्याच मंचावरून चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यासंदर्भात अत्यंत घाणेरडे भाष्य करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे.

मोदी यांच्यासमोर हे घडले, पण एरवी विरोधकांवर घसरणारे मोदी त्यांच्या उमेदवारांच्या बेताल बोलण्यावर गप्प बसले, जसे ते स्वपक्षाच्या निवडणूक रोखे भ्रष्टाचारावर तोंडास पट्टी बांधून गप्प बसले आहेत. मोदी व त्यांचे लोक देश बरबाद करीत आहेत व या बरबादीस रोखण्याचे कर्तव्य महाविकास आघाडीस पार पाडायचे आहे”, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून केली.

चंद्रपूर येथील सभेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे गटाचा उल्लेख नकली शिवसेना असा केला होता, यावरून ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी काल चंद्रपुरात येऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असून त्यांच्या चरणाशी जोडे पुसायला बसलेल्या मिंधे यांची शिवसेना खरी व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी आहे, असे म्हटले. मोदी यांचे हे विधान म्हणजेच त्यांच्या मनातील निराशेचा उद्रेक आहे.

शिवसेना फोडूनही उद्धव ठाकरे यांच्याच मागे महाराष्ट्र व मराठी जनता आहे, हे नैराश्य त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. मोदी यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी भय आहे. त्यांच्या बोलण्यातून ते भय दिसते. असली व नकली याचा फैसला महाराष्ट्राची जनता करेल, असेही ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटले आहे.