मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले की, स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवलेल्या ग्राहकांना सौर तासांदरम्यानच्या वीज वापरावर १० टक्के सवलत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे ३८ लाख ग्राहकांना थेट लाभ होणार आहे.
विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेदरम्यान सदस्य मिलिंद नार्वेकर, ॲड. अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, “सध्या राज्यात २७,८२६ फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर कार्यरत आहेत. या स्मार्ट मीटरमुळे वीजवापराचे अचूक व पारदर्शक मोजमाप शक्य झाले आहे.”
स्मार्ट मीटरसाठी केंद्र सरकारकडून २९ हजार कोटींचा निधी-
या योजनेंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्राला २९,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य न करता पर्यायी ठेवण्यात आले आहे. प्रत्येक युनिटचे बिल ऑटोमॅटिक तयार होणार असल्याने बिल वाढण्याची भीती निरर्थक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
निविदा प्रक्रियेतून चार कंपन्यांना कंत्राट-
स्मार्ट मीटर बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, चार खाजगी कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे. ग्राहकांना आता त्यांच्या वीजवापराचे रिअल टाईम मोजमाप आणि पारदर्शक बिल मिळणार आहे.
कोळीवाडे व वनजमिनीवरील ग्राहकांसाठी स्वतंत्र योजना-
कोळीवाडे व वन जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांनाही वीज मिळावी यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन योजना तयार केली जाणार आहे. ही योजना लवकरच न्यायालयात सादर करण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील सामान्य वीज ग्राहकांना पारदर्शक, अचूक व स्वस्त वीज सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ही योजना महाराष्ट्रासाठी एक मोठं पाऊल मानली जात आहे.