
मुंबई : विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागांवर दावा करत असल्याने काही मतदारसंघांवर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.
महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये याबाबत सातत्याने बैठका आणि चर्चा सुरू असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिंगोली-परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. याशिवाय पुणे मतदारसंघासाठीही राष्ट्रवादी आग्रही असल्याचे समजते. कोकण आणि हिंगोली-परभणी या जागांवरही राष्ट्रवादीने दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जागांवर अद्याप चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघांबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुणे जागेबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असून सर्व पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील, असेही त्यांनी म्हटले.
महायुतीतील संभाव्य जागावाटपाचाही अंदाज समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष सुमारे १२ जागांवर उमेदवार देऊ शकतो. शिवसेना शिंदे गट चार जागा लढवण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंतिम जागावाटपावर अजून शिक्कामोर्तब झाले नसले तरी पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असून पुढील काही दिवसांत महायुतीचा अंतिम फॉर्म्युला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.








