होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या प्रश्नांना डॉक्टरांनी दिली
‘फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तरे
नागपूर : लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जर घरात व्यवस्था असेल तर होम आयसोलेशन हा पर्याय आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी शासन आणि मनपाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. डॉक्टरांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. आनंद काटे यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून आजपासून (ता. ९) नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोव्हिड रुग्णांसाठी ‘कोव्हिड संवाद’ या शीर्षकांतर्गत ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमेय हॉस्पीटलचे डॉ. आनंद काटे आणि कोठारी हॉस्पीटलच्या डॉ. अर्चना कोठारी उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातील ‘कोव्हिड संवाद’मागील संकल्पना विषद केली. नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरिकांना उपचाराबाबत माहिती देणे गरजेचे आहे. आज लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आहे, जे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांना यादरम्यान काय करायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील शंका, प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर डॉ. अर्चना कोठारी यांनी होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना नेहमीच पडत असलेले प्रश्न विचारले. या प्रश्नांना डॉ. आनंद काटे यांनी समर्पक उत्तरे दिलीत. घरात जर स्वतंत्र खोली असेल, बाथरूम, शौचालय स्वतंत्र असेल अशा व्यक्तींनीच होम आयसोलेशनचा पर्याय निवडावा, असे सांगत होम आयसोलेशन दरम्यान शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, नियमित मास्क घालावा, कुटुंबातील लोकांना दूर ठेवावे, डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे न चुकता सेवन करावे, अशी उपयुक्त माहिती दिली. आरोग्य सेतू ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवावा. होम आयसोलेशनदरम्यान कुठलाही त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप आणि ऑक्सीजन लेवल सातत्याने तपासावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
अनेकांनी फेसबुकवर विचारलेल्या प्रश्नांनाही डॉ. आनंद काटे आणि डॉ. अर्चना कोठारी यांनी समर्पक उत्तरे देत रुग्णांचे समाधान केले. नियम पाळा, काळजी घ्या, प्रत्येकाला कोरोना आहे, या भावनेतून सामाजिक अंतर पाळा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उदया गुरुवार १० सप्टेंबर ला दुपारी २ वाजेपासून कोव्हीड संवाद कार्यक्रमामध्ये डॉ.रविन्द्र सरनाईक आणि डॉ. अर्चना कोठारी नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तरे देतील.