क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचा उपक्रम
अमरावती :- कोरोंना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र सरकारने संपूर्ण देशात टाळेबंद जाहीर केलेला असून काही भागात लोकांनाकडून अद्याप दुर्लक्षित केले जात आहे. परिणामस्वरूप केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो अमरावतीच्या वतीने अमरावती ग्रामीण, अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमावर्ती ग्रामीण क्षेत्र आणि शहरी भागामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
दिनांक 09 ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फिरत्या ऑडिओ रथाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील अमरावती ग्रामीण, नांदगाव खंडेशवर, अमरावती शहर, अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सीमावर्ती क्षेत्रातील एकूण 40 गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून घरी थांबणे, किराणा व जीवनावश्यक वस्तूंचा साठा न करणे, अति महत्वाच्या वेळी बाहेर पडणे, शेती उपयोगी कामे करताना सामाजिक अंतर राखून करणे, अनावश्यक गर्दी टाळणे, समाज माध्यमावरील अफवांना बळी पडू नका तसेच आरोग्य विषयक संदेश गावकऱ्यांना देण्यात येत आहेत. फिरती रथ दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गावोगावी फिरणार आहे.
या मोहिमेत अमरावती ग्रामीण भागातील आष्टी, रेवसा, वायनगाव, खारतळेगाव, धामोरी कसबा, वलगाव, नवसारी, डवरगांव, माहुली जहाणगीर, बोरगाव धर्माळे, नांदगाव पेठ, रहाटगाव, शहरी भागांमध्ये बडनेरा, गोपाल नगर, महादेव खोरी, मंगलधाम कॉलनी, संजय गांधी नगर, फ्रेजरपूरा, बिछू टेकडी, वडाळी, बेलपूरा आणि हमालापूरा, तसेच अकोल्या जिल्ह्यातील मूर्तीजापूर मध्यील रामटेक, आकोली जहंगीर, राजूरा सरोडे,राजनापूर, कावठा सोपीनाथ आणि वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील धनज खुर्द, डोंगरगाव, हिंगणवाडी, माळेगाव, डंगरखेड इत्यादी गावांमध्ये रथ फिरणार आहे.