Published On : Sat, May 12th, 2018

Aurangabad Violence : औरंगाबाद मधील इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद

Advertisement

Internet-Ban
औरंगाबाद: मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजारसह इतर ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर अफवा पसरू नये म्हणून औरंगाबादेतील इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला आहे. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला.

दरम्यान सोशल मीडियावरून घटनेचे फोटो, व्हिडिओ आणि अफवा पसरवल्या जात आहेत. अफवामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते त्यामुळे पोलिस प्रशासनाने 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असल्याची माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

स्थानिक आमदार अतुल सावे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. औरंगाबादकरांना आवाहन करतो की शांतता पाळावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घातलं असून, रात्रीच मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.”, असे स्थानिक आमदार अतुल सावे यांनी सांगितले आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा शांततेच आवाहन केलं आहे. हा वाद मोठा होण्यामागे अफवांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे

काय आहे प्रकरण
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरुवारपासून सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरुन मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन काल तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात दुकानांबाहेर असणाऱ्या कूलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरु केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली.