Published On : Sat, May 12th, 2018

…हा तर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बळी!

Advertisement

Ashok Chavan
नांदेड: कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरुन सुध्दा न मिळालेली कर्जमाफी व पिकविलेल्या शेतीमालास मिळालेला कवडीमोल भाव यामुळे अडचणीत आलेल्या यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शेतकरी शामराव भोपळे यांनी भाजप सरकारला जबाबदार धरत स्वतःला जाळून घेतले. त्यांनी मृत्यूशी झुंज देत आज अखेरचा श्वास घेतला. शामराव भोपळे यांची आत्महत्या नसून ही सरकारने केलेली हत्याच असून हा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बळी असल्याचे टिकास्त्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे सोडले.

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव रामा भोपळे या 68 वर्षीय शेतकर्‍याने आर्थिक विवंचनेला कंटाळून 6 मे रोजी स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ते 90 टक्के भाजले होते. त्यानंतर त्यांना नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मागील सहा दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. परंतु अखेर आज 12 मे रोजी भल्या पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीची त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारच्या शेतकर्‍यांबद्लच्या चुकीच्या धोरणामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. यवतमाळ जिल्हयात मागील काही दिवसातील ही चौथी घटना असून शेतकर्‍यांचे आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. शामराव भोपळे यांच्या मृत्यूस सरकारच कारणीभूत आहे.

सरकारची शेतक-यांबद्दलची उदासिनता व फसवी कर्जमाफी याचाच शामराव भोपळे हा बळी होय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली आहे.