मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सर्व पक्षांनी आपल्या घटक पक्षांसोबत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु केली. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर बैठक घेतली.
महायुतीत शिवसेनेला २० ते २२ तर राष्ट्रवादीला किमान १० जागांची अपेक्षा आहे. विद्यामान खासदार असलेल्या जागा त्याच पक्षांकडे राहतील, असे सूत्रांनी सांगितले. . मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेसकडे असलेल्या जागा भाजप, शिंदे किंवा अजित पवार गट यापैकी कोणी लढवायच्या यावरून महायुतीत मतभेद सुरु झाले आहे.
भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. कारण याठिकाणी अद्यापही जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही.शहा यांच्या बैठकीत तिढा सुटल्यास संसदीय मंडळाच्या गुरूवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान शहा बुधवारी सकाळी अकरा वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इंडियन ग्लोबल फोरमच्या वार्षिक संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.