
मुंबई: २८ जानेवारी रोजी घडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना धावपट्टीवर उतरताना विमान कोसळले. भीषण स्फोट आणि आगीत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघाताच्या कारणांबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता नसल्याने संशयाची छाया गडद होत आहे.
एफआयआर नोंदवण्यावरून वाद-
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेच्या तपासावर सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो स्वीकारण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या भूमिकेवर टीका केली होती.
राज ठाकरेंची भूमिका-
यानंतर रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अपघाताशी संबंधित तांत्रिक मुद्दे आणि तपासातील विसंगती याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “हा अपघात धुक्यामुळे झाला की कोणत्या धोकादायक कारणामुळे, हे महाराष्ट्राला कळलेले नाही. एफआयआर स्वीकारला गेला नाही, ही बाब गंभीर आहे.” त्यांनी सरकारवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही केला.
‘ब्लॅक बॉक्स’वरून नवा प्रश्न-
विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ जळाल्याच्या बातम्यांवरही राज ठाकरे यांनी शंका व्यक्त केली. “सामान्यतः ब्लॅक बॉक्स पूर्णपणे नष्ट होत नाही. मग या प्रकरणात नेमकं काय घडलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निष्पक्ष चौकशीची मागणी-
या सर्व घडामोडींमुळे अपघाताच्या तपासाबाबत अधिक पारदर्शकता आणि स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरत आहे. सरकारकडून अधिकृत अहवाल जाहीर होण्याची प्रतीक्षा असताना, या दुर्घटनेमागील सत्य काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.








