
चंद्रपूर : स्थानिक बेरोजगार युवक, कंत्राटी कामगार, प्रकल्पग्रस्त आणि विस्थापितांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. रोशन हरबडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा शनिवारी सहावा दिवस असून आंदोलनकर्त्यांनी भर उन्हात बसून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला.
गेल्या सहा दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. २ जून रोजी मुंडन आंदोलन, ३ जूनला WCL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे प्रदर्शन, तर ४ जूनला तोंडाला काळे फासून निषेध करण्यात आला. मात्र, या आंदोलनांची प्रशासनाने अद्याप गंभीर दखल घेतलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य, कंत्राटी भरती प्रक्रियेत पारदर्शकता, श्रम कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रकल्पग्रस्त तसेच विस्थापितांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात येत आहेत. वारंवार निवेदने व आंदोलने करूनही WCL प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने परिसरातील बेरोजगार युवकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे रोशन हरबडे यांनी सांगितले.
दरम्यान, उपोषणकर्ते रोशन हरबडे आणि नंथू नवले यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. आरोग्याची स्थिती चिंताजनक होत असतानाही प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
रोशन हरबडे यांनी सांगितले की, WCL अंतर्गत कार्यरत असलेल्या माती उत्खनन कंपनीच्या विरोधात हे आमरण उपोषण सुरू आहे.
यापूर्वीही आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते आणि WCL अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका झाल्या. मात्र, निर्णय घेण्याचा अधिकार असलेले वरिष्ठ अधिकारी बैठकींना उपस्थित राहिले नाहीत. स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार मागणी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने १ जूनपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता भर उन्हात आंदोलन करण्याची वेळ आल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.







