
नागपूर : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात लवकरच विधान परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा वेगाने सुरू झाली आहे. विशेषतः विदर्भातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १५ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तीन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या दोन तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना यांच्या प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे. सध्याच्या विधानसभा गणितानुसार महायुती आठ जागा जिंकू शकते, तर महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजप आमदारांचा कार्यकाळ संपणार-
भाजपचे दादाराव केचे, संदीप जोशी आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपत आहे. यापैकी संदीप जोशी यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तर दादाराव केचे पुन्हा एकदा विधान परिषदेत जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
भाजप नव्या चेहऱ्यांना देऊ शकते संधी-
या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला चार जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मागील निवडणुकांचा विचार करता विदर्भातून दोन नेत्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच पक्ष संघटनेत काम करणाऱ्या काही नेत्यांनाही विधान परिषदेत पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूरमधील या नेत्यांची चर्चा
नागपूर आणि विदर्भातून काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये माजी महापौर व शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, भाजपचे वरिष्ठ नेते राजीव पोद्दार आणि सुधाकर कोहडे यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
अलीकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १०२ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे राजीव पोद्दार यांच्या नावाचीही चर्चा वाढली आहे.
भाजप पुन्हा देणार का धक्का?
मागील राज्यसभा निवडणुकीत भाजपने नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना उमेदवारी देत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीतही पक्ष चर्चेत असलेल्या नावांनाच संधी देणार की पुन्हा एखादा अनपेक्षित चेहरा पुढे आणणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








