नागपूर : अवकाळी पावसामुळे विदर्भासह राज्यातील अनेक भागांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली असून, यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलासा दिला आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “प्राथमिक स्वरूपात शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत राज्यभरातील नुकसानीचा सविस्तर अहवाल मांडण्यात येईल. त्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरु होईल.”
बावनकुळे यांनी असेही स्पष्ट केले की, दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
त्यांनी पुढे सांगितले, “महाराष्ट्रात मे महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त आणि वेळीच पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भासह राज्यभरात पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.”
शेती क्षेत्राची मर्यादा घटवली; अधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ-
राज्य शासनाच्या मापदंडावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, “केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत असेच राज्य सरकारचे निकष आहेत. पूर्वी तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी मदत मिळत होती, ती मर्यादा आता दोन हेक्टरपर्यंत खाली आणण्यात आली आहे. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना आणि गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे.