नागपूर– नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावाला कंटाळून एका 34 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृतकाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुपती नगर येथील मनीष देवानंद देशभ्रतार याने सुमारे 12 वर्षांपूर्वी पूजा नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांना दोन मुले असून सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पूजा ही इतर व्यक्तींशी दीर्घकाळ फोनवर बोलत असे, यावरून मनीष आणि तिच्यात वारंवार वाद होत होते. या सततच्या भांडणांमुळे मनीष मानसिकदृष्ट्या खचत गेला होता.
दरम्यान, 14 मार्च 2026 रोजी पूजा ही कथितपणे प्रणय नावाच्या युवकासोबत घर सोडून गेल्याचा आरोप आहे. पत्नी अचानक घर सोडून गेल्याने मनीष मोठ्या धक्क्यात गेला होता. नंतर तो तिला विजयवाडा येथून परत घेऊन आला, मात्र त्यानंतरही दोघांतील मतभेद कायम राहिले.
काही दिवसांनी पूजा पुन्हा माहेरी निघून गेली. तसेच, दोन लहान मुलांची जबाबदारी स्वीकारण्यासही तिने नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पत्नीचे बदललेले वागणे, सततचा कौटुंबिक तणाव आणि सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे मनीष नैराश्यात गेला होता.
अखेर 20 एप्रिल रोजी त्याने आपल्या घरात सीलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुरुवातीला वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मृतकाची आई कविता देवानंद देशभ्रतार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पत्नीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना केवळ आत्महत्येची नसून, तुटणारे नातेसंबंध, मानसिक तणाव आणि वाढते कौटुंबिक वाद यांचे गंभीर वास्तव समोर आणणारी ठरत आहे.








