
मुंबई : देशातील सर्वात मोठी जीवन विमा संस्था असलेल्या एलआयसीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. लाखो-कोट्यवधी पॉलिसीधारकांचा विश्वास संपादन करणाऱ्या एलआयसीची एका खासगी कंपनीतील शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीमध्ये एलआयसीची सुमारे 10.80 टक्के भागीदारी आहे. या कंपनीत एलआयसीने जवळपास 347 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर अनियमितता आढळून आल्याने बाजार नियामक सेबीने कठोर पावले उचलली आहेत.
प्रकरण नेमके काय?
राजेश एक्सपोर्ट्समध्ये एलआयसीची मोठी हिस्सेदारी
सुमारे 347 कोटी रुपयांची गुंतवणूक
15 लाख कोटी रुपयांच्या निधीबाबत कथित गैरव्यवहाराचा आरोप
सेबी आणि एनएसईकडून कंपनीविरोधात कारवाई
शेअर व्यवहारांवर निर्बंध
गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण
कारवाईनंतर शेअरला लोअर सर्किट
सेबीने कंपनीचे प्रवर्तक राजेश मेहता यांच्यावर निधीच्या गैरवापरासह आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे.
या घडामोडींमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पॉलिसीधारकांच्या विमा संरक्षणावर किंवा दाव्यांच्या सेटलमेंटवर तत्काळ कोणताही परिणाम होणार असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, लाखो नागरिकांनी आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी एलआयसीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या प्रकरणावर एलआयसीने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आणि पॉलिसीधारकांच्या पैशांची सुरक्षितता अबाधित असल्याचा विश्वास द्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







