Published On : Thu, Apr 12th, 2018

6 नगरपालिकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची धूळधाण; 4 नगराध्यक्ष भाजपाचे, 1 स्वाभिमान तर 1 अपक्षांचा

Advertisement

BJP
मुंबई: भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. 6 पैकी 4 नगरपालिकांमध्ये सत्ता काबीज केली असून, एका ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचा तर एका ठिकाणी शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे.

आज ज्या 6 नगरपालिकांचे निकाल हाती आले, त्यानुसार, एकूण 115 पैकी 57 ठिकाणी भाजपा आणि भाजपा समर्थित नगरसेवक निवडून आले आहेत. यातही 48 नगरसेवक हे भाजपाच्या तिकिटावर तर 9 हे समर्थित आहेत. जामनेरमध्ये सर्वच्या सर्व 24 जागा भाजपाने आपल्याकडे ठेवल्या. अन्य कुठल्याही पक्षाला एकही जागा मिळाली नाही.

आजरा येथे भाजपा आणि ताराराणी यांनी 9 जागा जिंकून नगराध्यपद पटकाविले. याठिकाणी काँग्रेसला 6, तिसर्‍या आघाडीला 1 आणि एका जागी अपक्ष निवडून आले आहेत. वैजापूर, देवरूख येथेही भाजपाने अध्यक्षपद काबीज केले आहे. देवरूखमध्ये भाजपाला 7 तर वैजापूर येथे 8 जागा मिळाल्या. कणकवलीत 10 जागा जिंकून स्वाभिमानीचे नगराध्यक्ष झाले आहेत. 3 जागा भाजपाने मिळविल्या आहेत. गुहागरमध्ये शहर विकास आघाडीने 9 जागा जिंकल्या असून, 6 जागी भाजपा निवडून आली आहे.

राज्यात सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच्या सर्व निवडणुकींमध्ये भाजपाचा आलेख सतत उंचावतच राहिला आहे.