Published On : Sat, May 12th, 2018

औरंगाबादमध्ये दंगल; ३० जण जखमी

Advertisement

औरंगाबाद: दोन समाजातील भांडणातून औरंगाबाद शहरात मध्यरात्रीनंतर दंगल उसळली असून जाळपोळ आणि दगडफेकीत किमान ३० जण जखमी झाले आहेत. घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. वरिष्ठ अधिकारीही तातडीने हजर झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

दोन समाजात संघर्ष उफाळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी किरकोळ भांडण होऊन त्याचे पर्यावसन दंगलीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दंगलखोरांनी शहरातील किमान २५ दुकानं पेटवून दिली आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आली असून त्यात ३० जण जखमी झाले आहेत.

शहरातील गांधीनगर, राजाबाजार, शहागंज भागात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या दंगलीची काही दृष्ये हाती लागली असून मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर फिरताना दिसत आहे. काही जण हातात लाठ्याकाठ्या घेऊन दहशत पसरवत असल्याचेही दिसत आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू असून दंगलग्रस्त भागात सध्या कर्फ्यूसारखी स्थिती आहे.

दगडफेकीत १० पोलिस जखमी

मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट भिडल्याचे आता समोर येत आहे. तलावरी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले. पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर इतर गाड्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली आहे.