अहमदाबाद – अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातामध्ये मृतांचा आकडा आता २६५ वर पोहोचला आहे. एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाला उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की, अनेक मृतदेह पूर्णतः जळाले असून त्यांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणीचा आधार घ्यावा लागणार आहे.
गुजरात पोलिसांचे उपायुक्त कानन देसाई यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात एकूण २४१ प्रवासी होते, यापैकी सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातात फक्त एक प्रवासी बचावला असून त्याने विमानातून उडी मारून प्राण वाचवले.
अपघातानंतर हे विमान जवळील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. त्यामुळे वसतिगृहातील २४ जणांचा देखील मृत्यू झाला. एकूण २६५ लोकांचा बळी या दुर्घटनेत गेला आहे. अनेक मृतदेह विघटित झाले असून, शरीराचे तुकडे होणे आणि जळालेल्या अवस्थेमुळे ओळख पटवणं प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरत आहे.
गुजरातच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले गेलेले मृतदेह पाहता, संपूर्ण हॉस्पिटलमध्ये भीषण अवस्था निर्माण झाली आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले की, या मृतदेहांवर शक्य तितक्या लवकर ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेतले जात आहेत.
दरम्यान, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अपघातानंतर सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रं झपाट्याने व्हायरल होत असून, संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर विमान लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणार होतं. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच नियंत्रण सुटून विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, केंद्र सरकार आणि गुजरात सरकारकडून तातडीने मदत कार्य राबवण्यात येत आहे. विशेष हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले असून, मृतांच्या नातेवाईकांसाठी आवश्यक मदतीची व्यवस्था सुरू आहे.