नागपूर : थकीत मालमत्ता कर आणि पाणी कर जमा व्हावा या उद्देशाने मनपा प्रशासनाने अभय योजना दोन महिने कालावधीसाठी राबविली. या अभय योजनेतील कालावधीसह संपूर्ण आर्थिक वर्षात १५ फेब्रुवारी पर्यंत २१४.५४ कोटींचा मालमत्ता कर आणि १३५.१५ कोटींचा पाणी कर वसूल झाला आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके यांनी दिली.
विशेष म्हणजे, मागील वर्षी अर्थात १५ फेब्रुवारी २०२० या तारखेपर्यंत १९७.५१ कोटी मालमत्ता कर वसूल झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १५ फेब्रुवारी रोजी १७ कोटींनी अधिक वसुली झाली आहे. पाणी कर मागील वर्षी अर्थात १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत १२१.१७ कोटी वसूल झाला होता. यावर्षी ही वसुली १३५.१५ कोटी इतकी आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे.
थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून अभय योजना जाहीर केली होती. यात १५ डिसेंबर २०२० ते २० जानेवारी २०२१ पर्यंत थकीत मालमत्ता कर एकमुस्त भरल्यास शास्तीत ८० टक्के तर २१जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरल्यास शास्तीत ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. तर पाणी कर सवलतीसाठी २२ डिसेंबर २०२० रोजी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. याअंतर्गत २२ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत थकीत पाणी कर एकमुस्त भरल्यास शास्तीत १०० टक्के तर ३१ जानेवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत एकमुस्त भरल्यास शास्तीत ७० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती.
दरम्यान, मालमत्ता कर अभय योजनेची मुदत संपली असून पाणी कर अभय योजना संपण्यास अद्याप सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आणि थकीत मालमत्ता कर तातडीने भरण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

