नागपूर: सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने दोन विशेष तपास पथकांची (एसआयटी) नेमणूक केली आहे. बुधवारी राज्य सरकारतर्फे मुख्य सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
यामध्ये गोसीखुर्द सिंचन प्रकल्प व अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पासाठी पोलीस अधीक्षकाच्या नेतृत्वात स्वतंत्र एसआयटी नेमण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त या पथकात डीसीपी आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश असेल. चौकशीसंबंधी अहवाल देण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
सिंचन घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर गेल्या सुनावणीच्या वेळी एसआयटी चौकशीचे संकेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. 3 आठवड्यात सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते.
विशेष तपास पथकांच्या नियुक्तीमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावली आहे.