Published On : Fri, Jan 19th, 2018

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वणी येथे १५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

Advertisement

यवतमाळ : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे नवरगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने वणी शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आता शहराची ही समस्या सुटणार आहे. वर्धा नदीवरून पाईपलाईनद्वारे वणी शहराला करावयाच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी नगरपरिषदचे अध्यक्ष तारेंद्र बोरडे उपस्थित होते.

विदर्भ साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वणी नगर परिषदेच्या १५ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा तसेच दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या सांस्कृतिक भवनाचा (४ कोटी रुपये) शुभारंभ केला. ही योजना मंजूर करून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री मदन येरावार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोरडे यांनी प्रयत्न केले होते. तसेच येथे बांधण्यात येणारे नाट्यगृह अद्ययावत करण्यासाठी अतिरिक्त निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भुमिपूजन व कोनशिला उद्घाटनप्रसंगी वणी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, नगरसेवक तसेच इतर कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.