Published On : Wed, Sep 22nd, 2021

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 100 तर पंचायत समितीसाठी 156 उमेदवारांचे अर्ज वैध

Advertisement

– अर्ज मागे घेण्याची तारीख 27 सप्टेंबर

पाच ऑक्टोबर रोजी निवडणूक
सहा ऑक्टोबरला निकाल

नागपूर : येत्या 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या 16 गटात 100 तर पंचायत समितीच्या 31 गणात 156 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 21 सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.27 सप्टेंबरला दुपारी 3 नंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील उमेदवारांची यादी अंतिम होणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेतील 16 गटासाठी व 31 गणासाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

आज छानणीनंतर जिल्हा परिषदेसाठी 103 अर्ज वैध ठरले आहे.तर 3 अवैध ठरले आहे. पंचायत समितीच्या गणासाठी 160 अर्ज वैध आणि 4 अर्ज अवैध ठरले आहे . दोन गणात एकाच उमेदवाराने दोन –दोन अर्ज दाखल केल्यामुळे पंचायत समितीसाठी 154 उमेदवारांचे 156 अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्हाधिकारी विमला आर.यांनी आज निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला . त्यानंतर निवडणूक विभागाने यासंदर्भातील माहिती जारी केली आहे.

या निवडणुकीत 2 लक्ष 96 हजार 721 स्त्री मतदार व 3 लक्ष 19 हजार 292 पुरुष मतदार असे एकूण 6 लक्ष 16 हजार 016 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 1115 मतदान केंद्रावर होणाऱ्या या मतदानात ग्रामीण भागात 863 व शहरालगतच्या 252 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार धुळे,नंदुरबार,अकोला,वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्यातंर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूका होणार आहेत.

आयोगाने दिलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे वैध उमेदवारांची गट गण निहाय यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल 21 सप्टेंबरला प्रकाशित केली.

नामनिर्देशन पत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी आहे. त्यानंतर जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख सोमवार 27 सप्टेंबरपर्यत आहे. त्यानंतर जिल्हा न्यायाधिशांनी अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द 27 सप्टेंबरपर्यत करण्यात येईल. जेथे अपील नाही तेथे उमेदवारी मागे घेण्याची तारीख सोमवार 27 सप्टेंबरपर्यत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील तर जिथे अपील आहे तेथे बुधवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील.

निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप जेथे अपील नाही तेथे सोमवार 27 सप्टेंबर दुपारी 3.30 नंतर, त्यानंतर जिथे अपील आहे तेथे बुधवार 29 सप्टेंबर दुपारी 3.30 नंतर होईल.

दि. 5 ऑक्टोबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर बुधवार दि. 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी सकाळी 10 वाजतापासून सुरु होईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शुक्रवार दि. 8 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील.

नरखेड तालुक्यासाठी रविंद्र जोगी, उपजिल्हाधिकारी, काटोलसाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, कळमेश्वरसाठी उपजिल्हाधिकारी हेमा बढे, सावनेरसाठी उपविभागीय अधिकारी अतुल म्हैत्रे, पारशिवनीसाठी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, रामटेकसाठी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते ,मौद्यासाठी उपविभागीय अधिकारी एस.आर. मदनूरकर कामठीसाठी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, नागपूर ग्रामीणसाठी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, हिंगण्यासाठी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, उमरेडसाठी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, कुहीसाठी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, भिवापूरसाठी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.