Published On : Thu, Mar 30th, 2017

कुलरमुळे होणारे वीजेचे अपघात टाळण्याचे महावितरणचे आवाहन

Advertisement

नागपूर: सोमवार दि. २७ मार्च रोजी हुडकेश्वर येथील सोपान काळबांडे या ३६ वर्सीय इसमाचा कुलर लावीत असतांना अचानक वीजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला, याप्रकारे राज्यात दरवर्षी कुलरमध्ये विद्युत प्रवाह आल्याने जीवीत व वित्त हानीच्या शेकडो घटना घडतात, अश्या अप्रिय घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

कधी कुलरजवळ खेळतांना वीजेचा धक्का बसल्याने तर कधी टूल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा शॉक लागल्याने दुदैवी मॄत्यू झाल्याच्या घटना सातत्त्याने घडत असतात, यांसारखे अनेक अपघात उन्हाळयाच्या दिवसात होतात, ते टाळण्यासाठी ग्राहकांनी कुलरचा वापर सदैव थ्री पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्कीट ब्रेकर्स बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहजरित्या उपलब्ध असून वीजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडीत होऊन पुढिल अनर्थ टाळता येतो, घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी.

कुलरच्या लोखंडी बाहयभागात वीज पुरवठा येऊ नये याकरिता कुलरचा थेट जमीनी सोबत संपर्क येर्इल अशी व्यवस्था करावी जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाहयभागात वीज प्रवाहीत झाल्यास त्याचा धक्का लागणार नाही. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कुलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे, कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बूडली नसल्याची खात्री करून घ्यावी, कुलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये, कुलरची वायर सदैव तपासूण बघा. फ़ायबर बाहयभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कुलरचा वापर प्राधान्याने करा. घरातील मुले व इतर सदस्य कुलरच्या सानिध्यात येणार नाही याची खबरदारी घेऊनच कुलर ठेवण्यात यावा. कुलरमधील पाण्याचा पंप ५ मिनीट सुरू व १० मिनिट बंद ठेवणा­या इलेक्ट्रीकल सर्कीटचा वापर करा यामुळे वीजेचीही मोठया प्रमाणात बचत शक्य आहे.

ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर इभे राहून टुल्लू पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करून त्याचा प्लग काढल्यानंतरच पंपाला हात लावावा, पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी तसेच पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडली नसावी, पंपाचे अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे, पंपातून नळ वाहिनीत वीज प्रवाहीत होणार नसल्याची काळजी घ्यावी, बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचल्या जात नाही व तो पंप एअर लॉक होतो अश्यावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते, बरेचदा ज्ञानाच्या अभावामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केल्या जाते अश्यावेळी वीजेचा शॉक लागण्याची शक्यता असते त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

आपल्या दैनंदिन व्यस्ततेतून थोडासा वेळ आपण या उपाययोजनांकरिता दिला तर कुलरमुळे होणारे वीजेचे अपघात मोठया प्रमाणात टळू शकतात, त्यामुळे आजच या उपाययोजनांची अंमलबजावणी करीत अप्रिय घटना टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.