Published On : Thu, Feb 20th, 2020

…कर्म आणि अहंकारामुळे फडणवीस कोर्टात

Advertisement

फडणवीस पळून जाणार नाहीत, वकिलांचा युक्तिवाद, उके म्हणाले, कर्म आणि अहंकारामुळे फडणवीस कोर्टात

2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी नागपुरातील JMFC न्यायालयात सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस कोर्टात हजर (Devendra Fadnavis Nagpur court) राहिले.

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Nagpur court) यांना अखेर आज कोर्टात हजर राहावंच लागलं. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी नागपुरातील JMFC न्यायालयात सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस हजर (Devendra Fadnavis Nagpur court) राहिले. कोर्टाने फडणवीसांना 15 हजाराच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

याप्रकरणी कोर्टात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्येष्ठ विधीज्ञ सुनील मनोहर यांनी तर त्याविरोधात वकील सतीश उके यांनी स्वत: आपली बाजू मांडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाबाहेर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. यामागे नेमकं कोण आहे याची पूर्ण कल्पना आपल्याला आहे, असं फडणवीस म्हणाले.

त्याबाबत विरोधी वकील सतीश उके यांना विचारलं असता, ते म्हणाले, “असं कोणी कोणाच्या मागे नसतं. त्यांची कर्म त्यांच्यासाठी दोषी आहेत. त्यांच्या हरकती दोषी आहेत. त्यांचा अहंकार दोषी आहे. कोणीही राजकीय हात यामागे नाही”

“देवेंद्र फडणवीस आज कोर्टात हजर राहून त्यांनी जामीनासाठी अर्ज केला. मात्र आम्ही जामीनाला विरोध केला. आमचं म्हणणं होतं की अरविंद केजरीवालांना अशाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जेलची हवा खावी लागली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नातेवाईकाला कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात 15 हजारांची रक्कम भरावी लागली. त्यामुळे या खटल्यात देवेंद्र फडणवीसांना झुकतं माफ मिळू नये. कायद्याचं तत्व आहे, कलम 14 प्रमाणे समानतेने न्याय व्हावा. त्यावर कोर्टाने म्हटलं की आम्ही त्यांचा 15 हजाराचा बॉण्ड मागतोय. ते जर पुढील तारखांना आले नाहीत, त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांच्याकडून ते वसूल करु.

हा काही फडणवीसांना दिलासा नाही, आजपासून हा खटला सुरु झाला आहे. पुढची तारीख 30 मार्च असून, तेव्हापासून दोषारोप निश्चित केले जातील. त्यांना प्रत्येक तारखेला यावं लागेल”, अशी माहिती सतीश उके यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलांची प्रतिक्रिया

कोर्टात देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. आम्ही देवेंद्र फडणवीसांना PR बाँडवर त्यांना सोडण्यात यावं असा अर्ज केला. पर्सनल बाँडवर वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडावं असा अर्ज केला. माननीय कोर्टाने तो मान्य केला आणि फडणवीसांना वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. पुढील सुनावणीची तारीख 30 मार्च अशी दिली आहे.

वैयक्तीक जातमुचलक्यावर सोडलं आहे त्यामुळे तो दिलासा आहे असं म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस हे मोठं व्यक्तीमत्त्व आहे त्यामुळे ते कुठेही पळून जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे जामीन नक्कीच मिळू शकतो. यासर्व गोष्टींचा विचार करुन वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टाने त्यांना सोडलं आहे.

सुनील मनोहर हे वरिष्ठ अधिवक्ता आहेत. हा गुन्हा जामीन देण्याजोगा आहे, असा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला. फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. नागपूरमध्ये राहणारे रहिवाशी आहेत. नागपूरमध्ये त्यांची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे ते पळून जाण्याची शक्यता नाही. ते कोर्टात जे आदेश देईल ज्या अटी-शर्ती टाकतील त्या सर्व मान्य करतील. असा युक्तीवाद सुनील मनोहर यांनी केला. जो कोर्टाने मान्य केला.

नेमकं प्रकरण काय?

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली (SC verdict on Devendra fadnavis affidavit case) होती.

मग सुप्रीम कोर्टाने 18 फेब्रुवारीच्या सुनावणीत कोर्टाने नागपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.