Published On : Tue, Mar 2nd, 2021

आपली मनपा, आपले नागपूर, आपला अभिमान

Advertisement

मनपाच्या ७० व्‍या स्थापना दिनानिमित्त महापौर दयाशंकर तिवारी यांचे गौरवोद्गार

नागपूर : नागपूर शहराला वैभवशाली इतिहास आहे आणि गौरवशाली परंपरा आहे. असे नागपूर शहर आता सर्वच बाबतीत पुढे जात असून जगाच्या नकाशावर झळकू लागले आहे. नागपूर शहराच्या विकासाच्या मार्गात नागपूर महानगरपालिकेची महत्वाची भूमिका आहे. या महानगरपालिकेने राज्याचे व देशाला मार्गदर्शक ठरतील असे नेतृत्व दिले आहे, अशा आपल्या नागपूर शहराचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार महापौर दयाशंकर तिवारी यांनी काढले.

नागपूर महानगरपालिकेच्या ७०व्या स्थापना दिनानिमित्त महापौर दयाशंकर तिवारी यांनी संबोधित केले. प्रांरभी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर शहराचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून महापौर दयाशंकर तिवारी यांनी अभिवादन केले. तसेच डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात ही त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, दुर्बल घटक समिती सभापती कांता रारोकर, विधी समिती सभापती ॲड.मिनाक्षी तेलगोटे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, धंतोली झोन सभापती वंदना भगत, सतरंजीपूरा झोन सभापती अभिरुची राजगीरे, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक ॲड.संजयकुमार बालपांडे, नरेंद्र वालदे, प्रमोद कौरती, नगरसेविका प्रगती पाटील, आशा उईके, सुषमा चौधरी, नेहा निकोसे, विशाखा बांते, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, राजेश भगत, निगम सचिव डॉ.रंजना लाडे आदी उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि वैभवशाली इतिहास असलेले शहर आहे. त्या वैभवाची साक्ष देणा-या अनेक स्मृती आजही शहरात अस्तित्वात आहेत. गोंड राजे बख्त बुलंदशाह यांच्या नेतृत्वात नागपूरला राजधानी बनविण्यात आले. बख्त बुलंद शाह यांच्या पुत्राने त्यावेळी जुम्मा तलावाची निर्मिती केली ते तलाव आज गांधीसागर या नावाने परिचित आहे. बख्त बुलंद शाह यांनी महाल किल्ल्याची निर्मिती केली. अल्लाउद्दीन खिल्जी अमरावतीवर आक्रमण करायला जात असताना, त्याच्या आक्रमणापासून नागपूर शहराला वाचविण्याचे योगदान देणारी तोफ आजही महाल किल्ल्याच्या बुर्जावर ठेवली आहे. १८६४ मध्ये नागपूर नगरपालिकेची स्थापना झाली. होती व पुढे १९५१मध्ये नागपूर महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली. महानगरपालिका म्हणून नागपूर शहराचे पहिले महापौर म्हणून बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांनी नेतृत्व केले. आज त्याच महानगरपालिकेचा ५४ वा महापौर म्हणून अभिमान वाटत आहे, असे गौरवोद्गार महापौर दयाशंकर तिवारी यांनी काढले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत देशातील महापुरूषांनी या महानगरपालिकेला भेट दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक गणमान्य व्यक्तींनी नागपूर महानगरपालिकेला भेट दिली आहे.

मनपाच्या स्थापना दिनानिमित्त आजच्या कार्याची सुरूवात बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून, त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करीत आहोत. महानगरपालिका बनल्यानंतर पहिले महापौर म्हणून बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी पदभार ग्रहण केले होते. बॅरि. वानखेडे यांनी सामाजिक चळवळ पुढे नेण्यासाठी मोठे कार्य केले आहे. मुंबई येथे असलेले वानखेडे आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावाने आहे. नागपूर शहरातील व्यक्तीचे नाव देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला दिले जाणे ही बाब बॅरि. वानखेडे यांच्या कार्याची महती अधोरेखित करते.

देशाच्या संविधान समितीमध्ये आपले विषय यावेत, ओबीसी समाजासंदर्भात चर्चा असो असे प्रत्येक विषय गांभीर्याने मांडून त्याचा पाठपुरावा करणे व ते तडीस नेण्याचे काम बॅरि. शेषराव वानखेडे यांनी केले. शहराचे पहिले महापौर ठरलेले बॅरि. शेषराव वानखेडे यांची कन्या पुढे शहराची पहिली महापौर होणे ही सुद्धा शहरासाठी अभिमानाची बाब आहे. क्रीडा, शिक्षण, पर्यावरण व यासह अन्य सामाजिक कार्यामध्ये योगदान देणा-या कुंदाताई विजयकर यांना शहराची पहिली महिला महापौर होण्याचा मान मिळणे हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे, असेही महापौर म्हणाले.

नागपूर शहराचे महापौर म्हणून कार्य बजावणारे अनेकांनी विधिमंडळात नेतृत्व करण्याची परंपरा नागपूर शहराला लाभली आहे. शहराचे माजी महापौर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करून तो मान अधिक बुलंद केला. नागपूर शहराकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलविण्याचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. शहराचा महापौर म्हणून व इतर पदाधिकारी मनपामध्ये वेगवेगळ्या जबाबदा-या पार पाडत आहेत, याचे संपूर्ण श्रेय नागपूरच्या जनतेला जाते. त्यांच्या निवडीमुळे ही संधी मिळाली आहे, त्यामुळे जनतेचे या प्रसंगी मानावे तेवढे आभार कमी आहेत, असेही ते म्हणाले.

नागपूर शहराला ऐतिहासिक महत्व आहे. हे शहर आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. सांडपाण्याचा उपयोग विजनिर्मितीसाठी करण्याची संकल्पना मांडणारे हे देशातील पहिले शहर आहे. या शहरातील प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्राद्वारे हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. असे अनेक उपक्रम, प्रकल्प आपल्या शहरात व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहोत, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

‘सुपर-७५’ ला आयुक्तांची साथ
२६ जानेवारीला मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर-७५’ ही संकल्पना मांडली. या संकल्पनेंतर्गत आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेउन त्यामधून ७५ विद्यार्थ्यांची निवड करणे व त्यानंतर त्यांची बुद्ध्यांक चाचणी घेणे. पुढे त्यांच्या बुद्ध्यांकानुसार २५ अभियंता, २५ डॉक्टर व २५ एनडीए अधिकारी बनू शकतील, या दृष्टीने त्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे. त्यादृष्टीने कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची तारीखही निश्चित झालेली होती, मात्र कोव्हिड या संकटामुळे ती पुढे ढकलावी लागली. मनपा आयुक्त राधाकृष्णन यांनाही ‘सुपर-७५’ ही संकल्पना आवडली. या संदर्भात त्यांनी भेट घेउन या विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्थेसह त्यांच्या आरोग्याची जबाबदारी मनपातर्फे स्वीकारण्याचे त्यांनी सूचविले. जनप्रतिनिधींच्या योजनेला प्रशासनाची साथ मिळाल्यास त्यामधून मिळणारे फलीत कसे असू शकते, याचे उत्तम उदाहरण हे ठरले आहे, अशी भावनाही महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.