Published On : Tue, Jul 17th, 2018

माहितीची खातरजमा केल्याशिवाय तरुणांनी समाज माध्यमांवर पोस्ट करु नये – ब्रिजेश सिंह

Advertisement

नागपूर: फेसबुक, व्हॉट्सअॅप ही समाज माध्यमे आज जागतिक राजकारण बदलत आहेत. समाजमाध्यमांकडून आलेल्या पोस्टची कोणतीही खातरजमा न करता आपण ती पुढे पाठवित असतो. अशा अफवा पसरविणाऱ्या पोस्टमुळे समाजातील वातावरण बिघडते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी समाज माध्यमांवरील पोस्ट पुढे पाठविताना (फॉरवर्ड) सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून त्याची खातरजमा करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित ‘संसदीय लोकशाही पुढे नक्षलवादी चळवळीचे आव्हान आणि अफवांचे पीक, व्यवस्थेला धोका’ या विषयावरील परिसंवादात श्री. सिंह बोलत होते. यावेळी नागपूर शहराचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी नक्षलवादी चळवळीची माहिती दिली.

समाज माध्यमांमध्ये फिरणाऱ्या अफवांचे वास्तव विशद करून श्री. सिंह म्हणाले, समाज माध्यमे येण्यापूर्वी अफवा पसरविण्यासाठी व्यक्तीचा थेट सहभाग असायचा व त्यासाठी वेळ लागत असते. मात्र आता तंत्रज्ञानामुळे व सहज उपलब्ध असणाऱ्या समाज माध्यमांमुळे (सोशल मीडिया) काही क्षणात अफवा पसरविता येतात. आज कोणतीही खातरजमा न करता व्हॉट्सॲपवर आलेली पोस्ट पुढे पाठविली जाते. समाजातील महापुरुष, जाती, धर्म, शासनाविरुद्धची खोटी माहिती आदी पोस्टची खातरजमा न करता फॉरवर्ड करणे घातक ठरते. पारंपरिक माध्यमे ही प्रत्येक माहितीची खातरजमा करूनच ती प्रसिद्ध करत असतात.

परंतु समाज माध्यमांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे खातरजमा होत नाही. एखाद्या पोस्टबद्दल तक्रार करण्याची सुविधा फेसबुकमध्ये असली तरी व्हॉट्सॲपवर ती सोय नाही. अफवा पसरण्यापासून रोखणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे तरुणांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी ती घटना, पोस्ट खरी आहे का याची खातरजमा करावी. त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी.

समाज माध्यमांचा धोका ओळखून चीनने फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी बाहेरील समाज माध्यमांवर देशात बंदी घातली आहे. त्याऐवजी ते स्वतः तयार केलेल्या संपूर्ण सुरक्षित अशा माध्यमांचा वापर करतात. ट्विटरवरील अनेक अकाउंट हे बाहेरच्या देशातून चालविले जातात. त्याच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचे त्यांना हवे तसेच वातावरण तयार केले जाते. समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांचा संपूर्ण डेटा त्या कंपन्यांकडे उपलब्ध असल्यामुळे वापरकर्त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती कंपन्यांकडे असते. त्यामुळे वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होतो. तरुणांनी याबाबत दक्ष असायला हवे, असेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

शहरी भागातील नक्षलवादी चळवळीचा धोका या विषयावर श्री. बोडखे यांनी विश्लेषणात्मक माहिती दिली. ते म्हणाले, जंगली भागात सुरू झालेली नक्षलवादी चळवळ ही आता शहरांमध्येही पसरत आहे. देशातील 21 राज्यात नक्षल चळवळ असून त्यातील 14 राज्यात ते सक्रिय आहे. देशातील सिलिगुडी ते केरळ अशा सर्वच भागात सक्रिय आहेत. राज्यातील गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील जंगलांमध्ये नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. पोलिसांच्या विशेष पथकांनी गोंदियामधील चळवळीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविले आहे.

शहरांमधील कामगार, असंघटित क्षेत्रातील मजूर, वंचित घटक यांना एकत्र करून त्यांच्यामार्फत नक्षली कार्यवाही करण्याचे धोरण नक्षलवादी चळवळीने गेल्या काही वर्षांपासून सुरू केले आहे. कामगार संघटनांमध्येही या चळवळीने शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. याबरोबरच फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून विचारवंत, प्राध्यापक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी यांच्यामार्फत जंगलातील नक्षलवादींना मनुष्यबळ पुरविणे, साधनसामग्री पाठविणे, शस्त्र पुरवठा करणे व वैद्यकीय सुविधा करणे आदी कामे करण्यात येत आहेत. विचारवंत, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्या माध्यमातून प्रस्थापित शासनाविरुद्ध लोकांची मते बदलविण्याचे कामही चळवळीमार्फत करण्यात येत आहे, असेही श्री. बोडखे यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात केंद्रीय पोलीस दल, राज्य शासनाचे सी 60 पोलीस दल यांच्या माध्यमातून जंगलातील नक्षल चळवळीचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळीने आता शहरी भागाकडे लक्ष वळविले आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांची मदत नक्षलवादी घेत आहेत. सध्या राज्यातील सुमारे विविध 52 संघटना या नक्षल चळवळीला पाठिंबा देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून हिंसक कारवाई करण्याचे काम ही चळवळ करत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्यांपासून व हिंसा घडविण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांपासून दूर रहावे, असे आवाहन श्री. बोडखे यांनी केले.

यावेळी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी प्रास्ताविक केले तर ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे यांनी परिसंवादाचे विश्लेषण करून आभार मानले.