Published On : Mon, Apr 8th, 2024

योगींनी यूपीतच थांबावे महाराष्ट्रात येऊ नये,तिथे भाजपची परिस्थिती गंभीर;संजय राऊतांचा टोला

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात थांबायला हवं. तिथे भाजपाची परिस्थिती गंभीर आहे, असा टोला राऊतांनी लगावला. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. महत्त्वाचे म्हणजे यावेळी बोलताना उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

दहा वर्ष सत्तेत असतानाही भाजपाला मत मागण्यासाठी देशभर फिरावे लागते आहे. महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांना यावं लागतं आहे. खरं तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातच थांबायला हवं. तिथे भाजपाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुनही राऊत यांनी भाष्य केले.

मोदी हे सरकारी खर्चावर देशभरत फिरत आहेत. सरकारी खर्चावर ते निवडणुकीचा प्रचार करत आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे राऊत म्हणाले.