जागतिक युवा कौशल्य दिन साजरा
यवतमाळ। विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे, परंतु केवळ कौशल्य व कुशलतेचा अभाव असल्याने या संधीचा उपयोग घेता येत नाही. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेता प्रत्येकाने कौशल्यपुर्वक ज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, व्यवसास शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एस.व्ही.राठोड, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगारच्या सहाय्यक संचालक प्रांजली मशीदकर आदी उपस्थित होते.
आज संपुर्ण देशात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण यावेळी पाहण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त करतांना कुशल मनुष्यबळाचे महत्व विषद केले. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मदतीची आवश्यकता असते. त्यासाठी आवश्यकते शुल्क द्यावयास संबंधीत व्यक्ती तयार असतात. सर्वसामान्यांची गरज लक्षात घेता तशी सेवा पुरविण्याची उद्योग सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या त्या पध्दतीचे कौशल्य आत्मसात केल्यास प्रत्येकास स्वयंरोजगार उपलब्ध होवू शकत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी डॉ.कलशेट्टी यांचेही भाषण झाले.
यावेळी रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यशस्वी राबविल्याबद्दल अमोल इंडस्ट्रिजचे पांडुरंग खांदवे, रेमंडचे जनरल मॅनेजर श्रीवास्तव, हिमालय कार सेंटरचे किशोर गोपलानी यांना स्मृतीचिन्ह व वृक्ष भेट देवून गौरविण्यात आले. तसेच रेमंड व औरंगाबाद येथील प्रेस कॉम्पोनंट या कंपनीत नियुक्ती देण्यात आलेल्या युवकांना नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. त्यात आशिष पाल, बंडु राठोड, गणेश मेंडके, स्वप्निल पिंपळे, आकाश देशकरी, विशाल करमणकर, धनंजय शिरसागर, भुषण ढोबळे, सागर मोहोड या युवकांचा समावेश आहे.