Published On : Thu, Jan 16th, 2020

मानसिकता बदलविल्याशिवाय शहर स्वच्छ होणार नाही

Advertisement

मम्मी पापा यू टू अभियान : वादविवाद स्पर्धेतील सूर

नागपूर: शहर स्वच्छ करण्यासाठी आणि नागरिकांना मुलभूत सोयी देण्यासाठी महानगरपालिका ही केवळ यंत्रणा आहे. परंतू संपूर्ण शहर स्वच्छ ठेवायचे म्हटले की त्यात लोकसहभाग तितकाच महत्वाचा आहे. लोकसहभागाशिवाय कुठलाही हेतू साध्य होणार नाही. हे शहर माझे घर, अशी मानसिकता झाल्याशिवाय शहर स्वच्छ होणार नाही, असा सूर वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून उमटला.

निमित्त होते नागपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण विभाग आणि पोलिस वाहतूक विभागाच्या वतीने आयोजित ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाचे. १३ ते १९ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या चवथ्या दिवशी नागपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी शाळास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

‘शहर स्वच्छ ठेवणे ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी आहे’ हा स्पर्धेचा विषय होता. विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजू समर्थपणे मांडल्या. शाळा शाळांमध्ये वादविवाद स्पर्धेच्या विचारपीठावर चांगलेच शाब्दिक रणकंदन झाले. विषयाच्या बाजूने बोलताना विद्यार्थ्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छतेविषयी असलेल्या जागरूकतेचे कौतुक केले. महानगरपालिका ही सेवा देणारी संस्था आहे. ती नसती तर आज स्वच्छतेच्या बाबतीत शहरातील दृश्य फार वेगळे असते. सेवा देणारी ही संस्था असली तरी या शहराचे नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाचे शहराप्रती काही कर्तव्य आहे. आपले घर आपण जसे स्वच्छ ठेवतो तसेच हे शहर आपले घर समजून रस्त्यावर कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. चांगल्या सवयी लावून इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे, असा संदेशही विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून दिला.

विरूद्ध बाजूने बोलणा-या विद्यार्थ्यांनी नागरिकांवरील जबाबदारी झटकत स्वच्छता ही पूर्णपणे महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचे ठामपणे सांगितले. प्रत्येक नागरिक हा महानगरपालिकेतर्फे पुरविण्यात येणा-या सोयी सुविधांच्या मोबदल्यात कराचा भरणा करतो. स्वच्छता शुल्कही स्वतंत्रपणे अदा करतो. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिका ही यंत्रणाच जबाबदार असल्याचे सांगितले.

गुरुवारी (ता.१६) झालेल्या शाळा स्तरीय वादविवाद स्पर्धेमध्ये शहरातील ९४५ शाळांमधील ९७७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळास्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांची स्पर्धा केंद्र स्तरावर होईल. त्यातून महानगरपालिकास्तरावर विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येतील. वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महापौर संदीप जोशी यांनी स्पर्धकांचे कौतुक केले. शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात प्रत्येक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

४७९७ पालकांनी घेतला रांगोळी स्पर्धेत सहभाग
‘मम्मी पापा यू टू’ अभियाना अंतर्गत शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ हा स्पर्धेचा विषय होता. शहरातील ९४५ शाळांमध्ये ४७९७ पालकांनी उत्स्फूर्तपणे रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदविला. उत्कृष्ट रांगोळ्यांची निवड करून शाळा स्तरावर स्पर्धकांना पारितोषीक प्रदान करण्यात आले.