Published On : Thu, Sep 23rd, 2021

शोषित,पीडित,उपेक्षितांवरील अत्याचार सहन करणार नाही

Advertisement

– बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा महाविआ सरकारला इशारा

मुंबई– गेल्या अनेक दशकांपासून समाजातील प्रस्थांच्या दबावाखाली पिचले गेलेले शोषित,पीडित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मानवतावादी कार्य बहुजन समाज पार्टी करीत आहे. अशात या बांधवांवरील अत्याचार पार्टी कदापिही सहन करणार नाही, असा इशारा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी महाविकास आघाडी सरकारला दिला.परभणी शहरात संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

परभणी जिल्ह्यात तब्बल १०० हून अधिक अँक्ट्रोसिटी चे गंभीर गुन्हे दाखल आहे. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होवू नये याकरिता पीडितांवर राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर दबाव आणला जातो. अशात राजकीय बळावर प्रशासनाच्या वरदहस्ताने होणारे अत्याचार थांबवण्याचे कार्य बसपा करणार आहे, असे अँड.ताजने यांनी स्पष्ट केले. उपेक्षितांना पुन्हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर लोटणाऱ्यांच्या विरोधात बसपा आक्रमक भूमिका घेणार आहे. पार्टी शोषित, पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे समोर आल्यास बसपाचा कार्यकर्ता धावून येईल,असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

शोषितांवर होणाऱ्या अत्याचारासह शहर,ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.शहरी भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहे. दलित वस्त्यांमध्ये पावसाच्या पाण्याचा शिरकाव होत असल्याचे रोगराई पसरण्याची टांगती तलवार त्यांच्यावर लटकत आहे.अशात प्रशासनाने या समस्येची योग्य दखल घेतली नाही, तर बसपाकडून आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज जोडणीचे काम अपुर्ण आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी त्यामुळे वीज पोहचलेली नाही, अशी खंत अँड.ताजने यांनी व्यक्त केली.

शहरात वाहतूक सिंग्नलची यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पार्किंगची देखील व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी बसपाकडून करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्या रूग्णालयातील क्ष किरण तसेच इतर महत्वाच्या मशीन बंद असल्यामुळे गरीब, गरजू रूग्णांची हेळसांड होत आहे. खासगी रूग्णालयांमध्ये जादाचे पैसे मोजून या रूग्णांना त्यांचा तपासण्या करून घ्यावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील अँड.ताजने म्हणाले.


कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश महासचिव दिगंबर डोले, प्रदेश सचिव गंगाधर पोळ, प्रदेश सदस्य भीमराव जोंधळे, झोन प्रभारी देवराव दादा खंदारे, जिल्हा प्रभारी जाफर खान,युवराज सूर्यतळे,राजेंद्र घनसावंत,जिल्हा अध्यक्ष गौतम उजगरे, जिल्हा उपाध्यक्ष अनंता दिपके,
महासचिव मोबिन खान, सचिव राजेश केंदळे, प्रसेनजीत मस्के तसेच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

ओबीसींचे राजकीय हक्क बसपात सुरक्षित-रैना
इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारकडे मागितला होता. पंरतु, केंद्र सरकारने हा डेटा देण्यास नकार दिला आहे. राज्य आणि केंद्र सरकारमधील भांडणात मात्र ओबीसी बांधव भरडले जात आहे. बहुजन समाज पार्टीतच ओबीसींचे राजकीय तसेच इतर आरक्षण सुरक्षित आहे, असा दावा प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केला. केंद्रातील भाजप सरकार तसेच राज्यातील महाविकास आघाडी आरक्षण विरोधी आहे. दोघांची एकमेकांसोबत असलेली छुपी यूती सर्वसमाजाकरीता धोक्याची घंटा आहे. अशात या सरकारला धडा शिकवण्यासाठी ओबीसी बांधवांनी बसपाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे,असे आवाहन रैना यांनी यानिमित्त केले.