मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना सोन्याची खरेदी कमी करण्यासह पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खुले पत्र लिहित सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे.
मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना काटकसरीचा सल्ला देत सोनं खरेदी टाळा, परदेश दौरे कमी करा, पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवा आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, असे आवाहन केले होते. या विधानानंतर आता राज ठाकरे यांनी सरकारलाच अनेक थेट प्रश्न विचारले आहेत.
देश आणि राज्यांची अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना सरकार याबाबत स्पष्टपणे बोलत नसल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला. कच्च्या तेलाच्या किंमती कमी असतानाही नागरिकांकडून महाग दराने पेट्रोल-डिझेलची विक्री करण्यात आली, मग त्या माध्यमातून जमा झालेला पैसा नेमका कुठे गेला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सामान्य जनतेला खर्च कमी करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांचे ताफे, प्रचार दौरे आणि भव्य कार्यक्रम सुरूच असतात, अशी टीकाही त्यांनी केली. “सरकारच्या चुकीचा भार नेहमी जनतेनेच का उचलायचा?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख करत निवडणुका जिंकण्यासाठी अशा योजनांच्या माध्यमातून ‘रेवड्या’ वाटल्या जात असल्याचा आरोप केला. अशा निर्णयांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर निशाणा साधत, लोकांना परदेश प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यापूर्वी सरकारने स्वतःपासून काटकसर सुरू करावी, असे त्यांनी म्हटले. सरकारने देशासमोर अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती मांडावी, संसदेत सविस्तर चर्चा घडवून आणावी आणि पुढील आर्थिक धोरण स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.









