पाटणा : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी सर्व विरोधकांनी एकजूट होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटणा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील जवळपास २० पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या बैठकीला जाणार आहेत. या बैठकीला जाण्यापूर्वी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांसोबत सोबत संवाद साधला.
विरोधी पक्षांची पाटण्यात बैठक होतेय, या बैठकीत विरोधकांची काय रणनीति ठरवली जाणार आहे? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. यावर पवार म्हणाले की, यासंदर्भात आज सांगता येणार नाही. या बैठकीत देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. काही राज्यांमध्ये गंभीर प्रश्न आहेत, जसे की मणिपूरमधील हिंसाचार , यांसारख्या विषयांवर तिथे चर्चा होईल. या ना त्या निमित्ताने रस्त्यावर उतरणं, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणं अशी कृत्ये देशात वाढली आहेत.
विशेषतः ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही तिथे हे सगळं घडत आहे. त्यामुळे यामागे कोणाचा हात आहे हे दिसून येत असल्याचे पवार म्हणाले. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यांसारख्या प्रश्नांवर एकत्रितपणे विचार करून एक भूमिका ठरवावी यावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीत अन्य राज्यांमधील महत्त्वाचे मुद्दे तिथले नेते उपस्थित करतील. परंतु ते मुद्दे काय असतील ते मी आत्ता सांगू शकणार नाही. तसेच या बैठकीला काँग्रेसही उपस्थित राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.